ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवले असल्याचे म्हणत अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल चांगलेच आक्रमक झाले आहेत. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचे बादल यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यात कृषी कायदा रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले आहे. तसे पत्रच बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.
यापूर्वी कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचा एनडीएतील सर्वात जुना मित्र असलेला शिरोमणी अकाली दल युतीतून बाहेर पडला आहे.