ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी यूएईला पोहचलेले पाकचे गृहमंत्री शेख रसीद यांना पाकने या सामन्याच्या एक दिवस आगोदरच मायदेशी बोलावून घेतले. शनिवारी रसीद मायदेशी पोहचल्याचे पाकच्या जिओ न्यूज चॅनेलने म्हटले आहे.
बंदी असलेल्या कट्टरपंथी इस्लामी समूह तहरिक ए लब्बिक पाकिस्तानचे प्रमुख हाफिज साद हुसैन यांना नजरकैदेत ठेवल्याच्या निषेर्धात इस्लामाबादमध्ये लाँगमार्च काढण्याचा इशारा या संघटनेने दिला होता. त्यामुळे देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी गृहमंत्री शेख रसीद यांना यूएईवरुन मायदेशी बोलावले. त्यामुळे शेख रसीद यांना भारत-पाक सामन्याच्या एक दिवस आगोदरच मायदेशी परतावे लागले.
दरम्यान, या लाँगमार्चला रोखण्यासाठी शनिवारी पाकिस्तानच्या अर्धसैनिक बलांनी 500 हून अधिक कर्मचारी आणि 1000 सीमा सुरक्षा दलांच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत. इस्लामाबादमध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या सर्व मार्गाव प्रत्येकी 200 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच फैजाबाद आणि रेड झोनसह वेगवेगळय़ा ठिकाणी 1400 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.