ऑनलाईन टीम/तरुण भारत
आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य करत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दोन भारताबद्दलच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारताचे होते. त्यामुळे ते इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो,” असं विज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या ‘दोन भारत’च्या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. अनिल विज यांनी म्हणाले की, त्यांच्या पालकांमुळेच त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दोष आहे. विज म्हणाले की, गांधींच्या कुटुंबात जन्मलेल्यांचं संगोपन इटालियन आई आणि भारतीय वडिलांनी केलेलं असल्यानं त्यांना एका ऐवजी दोन भारत पाहण्याची सवय आहे.