गोव्याच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी
पणजी / प्रतिनिधी
गोव्याच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी करीत राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली ’आप’ कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. म्हादई गोव्याची जीवनवाहिनी आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अजेंडय़ासाठी ती बलिदान देऊ शकत नाही, असे यावेळी आपच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
म्हादई विषयी केंद्र सरकारकडे विचारणा करणाऱया सर्व पक्षीय शिष्टमंडळात ‘आप’ला देखील सामील करून घ्यावे, अशी मागणी राहुल यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यास सहमती दर्शविली आणि दिल्लीत ही भेट लवकरात लवकर ठरवण्यास सांगितले गेले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादई गोंधळासाठी केवळ काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. आज जलसंपदा मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स हे आधीच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. गोवा आणि गोव्याच्या हिताचा विश्वासघात काँग्रेसने केला, त्याच धोरणाचा अवलंब भाजप आता करीत आहे असे समजायला पाहिजे का असा सवाल त्यांनी केला. गोव्याला मुख्य गोड पाणीपुरवठा करणाऱया म्हादई नदीच्या संरक्षणासाठी मदत मागण्याकरिता म्हादईच्या मुद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत भूमिका घ्यावी, तसेच अलिकडच्या काळात सर्वाधिक पाऊस झाला असतानाही यावषी गोव्यातील पाण्याची पातळी कमी असल्याचे त्यांना म्हांबरे यांनी निदर्शनास आणून दिले.