नदीपात्र कक्षेतील राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी अमित शहा चर्चा करणार
प्रतिनिधी/ पणजी
म्हादई वळविण्याच्या मुद्द्यावर सध्या कर्नाटक आणि गोवा राज्य पातळीवर चर्चा केली जात आहे, जेव्हा हे मुद्दे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयासमोर येतील, तेव्हा आम्ही वस्तुस्थितीचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करू आणि त्यानंतर तज्ञांच्या मतावर आधारित निर्णय घेऊ, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्रसिंग यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. म्हादईच्या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला असता केंद्रीयमंत्री यादव यांनी मिळमिळीत उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. म्हादईबद्दल भाष्य करण्यासाठी मी तज्ञ नाही आणि म्हादईचे पाणी वळवण्याच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. या विषयी तपशीलवार अभ्यास केल्यावर म्हादईबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, अशी प्रतिक्रिया देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीयमंत्री भूपेंद्रसिंग सध्या गोव्यात आले असून काल शनिवारी भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्यातील वन आणि पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार
प्रेमेंद्र शेट व जयराम खोलकर उपस्थित होते.
भूपेंद्रसिंग यादव पुढे म्हणाले की, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे सध्या या संदर्भात विधान करण्यास मंत्री सक्षम आहेत. म्हादई संबंधित अर्ज आणि तज्ञांची मते आमच्यासमोर येतील, तेव्हा आम्ही सर्व तथ्यांचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. म्हादई प्रकरणावर भाष्य करण्यास सांगितले असता, अभ्यास न करता त्यावर भाष्य कसे करता येईल? असा उलट सवाल त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाबाबत विचारणा केली असता यादव म्हणाले की, गृहमंत्री म्हादई नदीपात्र कक्षेतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत. असेही भूपेंद्रसिंग पुढे म्हणाले.
डबल इंजिन सरकारच्या भूमिकेमुळे संभ्रम?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्याबाबत गोवा सरकारशी चर्चा करण्यात आली असून आता हा प्रश्न मिटला असल्याचे वक्तव्य केले. एकंदरित म्हादईचे पाणी वळविण्यास गोवा सरकारची मान्यता असल्याचे सभेत सांगितले. दुसरीकडे मात्र गोव्यातून पाणी कर्नाटकाला पाणी वळविण्यास प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे सध्या गोव्यात हा विषय धगधगत आहे. दुसऱ्या बाजूने केंद्रीयमंत्री भूपेंद्रसिंग यादव गोव्यात येतात आणि वस्तुस्थितीचा शास्त्राsक्त पद्धतीने अभ्यास करू आणि त्यानंतर तज्ञांच्या मतावर आधारित निर्णय घेऊ असे सांगतात. केंद्रातील दोन मंत्र्यांचे वक्तव्य दोन दिशेने असल्याचे दिसून येत आहे. डबल इंजिन सरकार लोकांमध्ये संभ्रम का निर्माण करीत आहेत? असा सवालही उपस्थित होत आहे.
देशाची विकास शिखराच्या दिशेने वाटचाल
केंद्रीयमंत्री भूपेंद्रसिंग यादव यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाबाबत दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करणारा आहे. अर्थसंकल्पातील विविध मुद्दे स्पष्ट करताना ते म्हणाले की देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील हा पहिलाच अर्थसंकल्प असून देश विकासशिखराच्या दिशेने वाटचाल करीत आहे.