प्रतिनिधी/मडगाव
केंद्राच्या दडपणाखाली गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. म्हादई वाचविण्यासाठी आणि कर्नाटकात वळविण्यात आलेले पाणी पुन्हा गोव्यात आणण्यासाठी सरकारचा कृती आराखडा काय हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांत जाहीर करावे, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आल्यावेळी म्हादई प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर म्हादईबाबत सरकारकडे लपविण्यासारखे काही नाही, तर केंद्रीय मंत्र्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे का टाळले आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
…तर विधानसभाही बरखास्त करा
दोन दिवसांत जर सरकार कृती आराखडा सादर करू शकत नसेल, तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विधानसभाही बरखास्त करावी. पुढील निवडणूक म्हादई प्रश्नावर होऊ द्या. उगाच आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगून वेळ मारून नेऊ नका. केंद्र सरकार आपले ऐकत नसेल, तर राजीनामा द्या आणि म्हादईसाठी पुन्हा रिंगणात उतरा, असे आव्हान सरदेसाई यांनी सरकारला दिले आहे. हे सरकार पाडण्याची वेळ येऊन ठेपली असून त्यासाठी सर्व गोवावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. गोवा वाचवायचा असेल, तर याची नितांत गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अवमान याचिकेसंदर्भात सरकार निंद्रिस्त
म्हादई जलतंटा लवादाने कर्नाटकाला पिण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी देताना हे करण्यापूर्वी गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील तज्ञांची समिती नेमण्यास सांगितले होते. पण ही समिती नेमण्यापूर्वीच कर्नाटकाने पाणी वळविले आहे. राज्य सरकारचे अधिकारीही हे मान्य करतात. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण या महत्त्वाच्या प्रश्नावर गोवा सरकार मागचा एक महिना निंदिस्त आहे आणि या सरकारातील मंत्री नीलेश काब्राल मात्र या प्रश्नावर आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगत आहेत. हा दुटप्पीपणा का, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री म्हादई आपल्याला आईसारखी आहे असे म्हणतात, पण पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवेळी ते यासंबंधी एकही शब्द बोलत नाहीत. उलट त्यांचा सहभाग गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवसायात असल्याने फक्त खनिज व्यवसाय गोव्यात कसा सुरू केला जाऊ शकतो यावर ते बोलून येतात. यावरून काय समजावे, असा सवाल त्यांनी केला आहे.
गोवा विकायला काढला जावडेकर यांनीच म्हादईचे पाणी वळविण्याचा आदेश दिला. त्यांनीच मोले नष्ट करणाऱया प्रकल्पांना मंजुरी दिली. महामारीच्या स्थितीचा फायदा उठवून या सरकारने गोवा विकायला काढला असून गोवा सरकारचीही त्याला संमती आहे. ड्रोनच्या साहाय्याने जे चित्रीकरण करण्यात आले आहे त्यातून म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविले आहे हे स्पष्टपणे दिसते. यामुळेच यंदा विक्रमी पाऊस पडूनही म्हादई केवळ ओढय़ासारखी वाहत आहे. दूधसागरही आटू लागला आहे असे स्थानिक लोक सांगतात. मात्र गोवा सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. या सरकारचे पापाचे घडे भरले आहेत. गोव्याची जनताच त्यांना धडा शिकवेल, असे त्यांनी म्हटले आहे.