संपादक संमेलनात सागर जावडेकर यांचे परखड मत
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. अर्धाहून अधिक गोवा या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. कर्नाटक सरकारकडून जे कटकारस्थान चालले आहे, ते पाहता म्हादईच्या अस्तित्त्वाबाबत गोव्याच्या राजकारण्यांकडून फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. त्यासाठी प्रत्येक नागरिक व विविध संघटनांनी या अन्यायाविरोधात गोव्याचा आवाज बुलंद करण्यासाठी दबाव वाढविण्याची गरज आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी आपले राजकीय मतप्रवाह बाजूला ठेऊन म्हादईच्या लढय़ात एकदिलाने सहभागी होणे ही काळाची गरज आहे, असे परखड विचार दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी मांडले.
बोरी येथील साई दुर्गा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या संपादक संमेलनात ‘म्हादईवरील दुष्परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या परिषद सभागृहात शनिवारी दुपारी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर तर खास निमंत्रीत म्हणून फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, कला मंदिरचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक रितेश नाईक व पत्रकार सुभाष नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
म्हादईच्या मुद्दय़ावर आजवर घडलेल्या राजकीय व अन्य पातळीवरील घडामोडींचा सागर जावडेकर यांनी आढावा घेतला. म्हादईचा उगम भिमगडहून होतो. या नदीचा बहुतांश भाग गोव्यात सामावलेला असल्याने ती या राज्याची जीवनदायिनी ठरते. म्हादईचे पाणी मलप्रभेकडे वळवून कर्नाटक सरकार गोमंतकीयांच्या भावनांशी खेळत आहे. पिण्याच्या पाण्याचे कारण पुढे करुन संपूर्ण म्हादईचा मोठा प्रवाह शेतीसाठी वळविण्याचा कर्नाटकचा हा कट वेळीच उधळून न लावल्यास भविष्यात गोव्यावर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जावडेकर यांनी दिला. कर्नाटक राज्यातील प्रत्येक राजकीय नेता व तेथील सर्व स्तरातील जनता म्हादईच्या मुद्दय़ावर एकत्र येते, मात्र गोमंतकीयांमध्ये ही एकजूट दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा कर्नाटकला छुपा पाठिंबा असल्याचे सांगून गोव्यातील सरकार व येथील राजकीय नेतृत्त्व म्हादईच्या प्रश्नावर दबाव वाढविण्यास कमी पडत असल्याचे ते म्हणाले. यापुढे गोमंतकीयांनी अधीक दक्ष होऊन प्रखर लढय़ासाठी सज्ज होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार प्रभाकर ढगे ‘पर्यटन शाप की वरदान’ या विषयावर बोलताना गोव्याने खनिज व्यावसायावर निर्भर न राहता पर्यटनाच्या विविध अंगाचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली. आपल्या संस्कृतीची खरी ओळख जगाला करुन देण्यासाठी गोव्याचे वास्तव चित्र पर्यटनाच्या माध्यमातून पुढे आणावे लागेल. कार्निव्हल, चर्चेस किंवा समुद्र किनारे एवढय़ापुरती येथील संस्कृती मर्यादित नाहीत हे पटवून देताना, ग्रामीण पर्यटन व इको टुरिझमला चालना देणारे येथील ऐतिहासिक वारसा व जैव विविधतेचे दर्शन घडविणारे पर्यटन विकसित करावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
पत्रकार सुभाष नाईक म्हणाले, गोव्यात येणारे पर्यटक हे आपल्या समृद्ध संस्कृतीकडे आकृष्ट होत नाहीत. उलट समुद्र किनाऱयावरील धिंगाण्यामध्ये ते अधिक रमतात. भोगवाद आणि चंगळवादासाठी त्यांना गोव्यातील वातावरण पुरक आणि पोषक वाटते. गोव्यातील औषधी वनस्पती, त्याचप्रमाण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अमृतवेलसारख्या संजीवक आणि रोगप्रतिकारक वनस्पतींचा व्यावसायिक वापर करणे शक्य आहे. रोजगार निर्मितीला ज्यामुळे वाव मिळेल. गोव्यातील पारंपरिक व्यावसायांचे प्रगतरित्या पुर्नवसन झाल्यास तरुणवर्ग आर्थिक प्रवाहात येईल. गोमंतकीयांनी आपले सुशेगादपण बाजूला ठेऊन आत्मनिर्भर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विजयकुमार शेट यांनी 60 वर्षांच्या मुक्तीनंतरच्या गोव्याचा आढावा घेतला. ज्या भाऊसाहेब बांदोडकरांच्या अथक प्रयत्नामुळे गोव्यात ज्ञानगंगा प्रवाहीत झाली त्याच गोव्यात आयआयटीसारख्या प्रकल्पाला जागा का मिळू नये ? असा प्रश्न उपस्थित करीत, फोंडा तालुक्यातील भूतखांब केरी पठारावर आयआयटी आणण्याचे मत त्यांनी मांडले. पारंपरिक शेती व्यावसाय बुडवून त्याजागी मत्स्य उत्पादन होत असल्याची खंतही व्यक्त केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विकासाचा कणा असल्याचे ते शेवटी म्हणाले.
सरकारी अधिकाऱयांची मानसिकता बदलली पाहिजे – गोविंद गावडे
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, 70 टक्के सरकारी अधिकारी आपल्या जबाबदारीच्या पदाकडे संकुचित मानसिकतेतून पाहत आहेत. त्यांनी मनात आणले तर विकास, महसूल, सरकारी योजनांची यथोचित अंमलबजावणी होऊ शकते. प्रत्येकजण सरकारी नोकरीसाठी धडपड करतो. हे चित्र बदलले पाहिजे. कर्तव्य भावपेपेक्षा पैशाला महत्व देण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली असून कुठलाही उद्योग आणि नोकरी करण्याची धमक सुसेगाद गोवेकरामध्ये हवी, असे त्यांनी नमूद केले.
घटक राज्याची मागणी रास्त होती का ? रवी नाईक
आमदार रवी नाईक यांनी राज्याच्या डळमळलेल्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना, आजची आर्थिक पाहिल्यास गोव्यासाठी घटक राज्याची झालेली मागणी रास्त होती का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्राकडून मुबलक प्रमाणात निधी पुरवठा होत असतो. त्याचप्रमाणे विकाससाठी साधनसुविधाही मिळतात. आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकून टाकण्यापेक्षा पुढच्या पिढीसाठी त्या राखून ठेवल्यास गोंयकारपणे टिकून राहणार असे ते म्हणाले. यावेळी डॉ. अनिल गावणेकर यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना योद्धो म्हणून फोंडय़ातील पत्रकारांचाही भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला. दिपप्रज्ज्वलीत करुन व नेताजी सुभाषचंद बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन संमेलनाचे उद्याटन करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष आमदार सुभाष शिरोडकर यांनी स्वागत केले. शैलेश बोरकर यांनी प्रासताविक व आभार मानले. पत्रकार नरेंद्र तारी व गिरीष वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले.