गोव्याच्या अस्तित्त्वासाठी एकजूट दाखवा :
प्रतिनिधी/ फोंडा
म्हादईसाठी उभारण्यात आलेल्या जनआंदोलनाचा भाग म्हणून येत्या 26 जाने. रोजी खांडेपार येथे भव्य कलश मिरवणूक व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गोमंतकीय जनतेबरोबरच सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले. म्हादईच्या व गोव्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व कर्नाटक सरकारला गोव्याची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. केतन भाटीकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मगोचे फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक, कुर्टीचे पंच सुधीर राऊत, नगरसेविका अमिना नाईक व सीमा फर्नांडिस हे उपस्थित होते. 26 जाने. रोजी सकाळी 10 वा. खांडेपार ओपा जंक्शनपासून कलश मिरवणुकीला सुरुवात होईल व म्हादईच्या उगम स्थानावरून आणलेल्या जलकलशाचे खांडेपार येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराजवळ पूजन होईल. त्यानंतर मांडवी व खांडेपार नदीच्या संगमावर कलश विसर्जन होईल. त्यानंतर म्हादई बचाव आंदोलनाचे नेते व पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे म्हादई विषयावर प्रमुख भाषण होणार आहे. म्हादईसाठी याठिकाणी धरणे कार्यक्रम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपासह सर्व पक्षांचे आंदोलनासाठी स्वागत
म्हादईच्या पाण्याचा खांडेपार नदीच्या माध्यमातून गोव्याला पुरवठा होतो. खांडेपार भागात मांडवीचे खारे पाणी व खांडेपार नदीच्या गोडय़ा पाण्याचा संगम होतो. म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविल्यास मांडवीचे खारे पाणी ओपा पाणी प्रकल्पापर्यंत पोचण्याचा धोका आहे. तसे झाल्यास गोव्याच्या पाणी पुरवठय़ावर गंभीर परिणाम होऊन पाण्याचे मोठे दुर्भीक्ष निर्माण होईल. भविष्यातील हे धोके लक्षात घेऊन सर्व गोमंतकीय जनतेने आत्तापासूनच आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव वाढविणे गरजेचे आहे. 26 रोजी होणारे हे आंदोलन सर्वपक्षीय असून सामान्य नागरिकांपासून विविध पक्षांचे कार्यकर्ते व नेत्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. या आंदोलनासाठी गोवा फोरवर्डचे विजय सरदेसाई, काँग्रेस नेते, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक तसेच भाजपाचे फोंडय़ातील नेते व कार्यकर्ते सहभागी झाल्यास त्यांचे निश्चितच स्वागत आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
यापूर्वी माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंह राणे, रवी नाईक यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्यास शासकीय पातळीवर विरोध केला होता. माजी जलसंवर्धनमंत्री दयानंद नार्वेकर यांनी त्यावेळी रोखठोक पत्र केंद्र सरकारला पाठविले होते. सध्याचे सरकार मात्र म्हादईच्या प्रश्नावर गंभीर दिसत नाही, असा आरोपही सुदिन ढवळीकर यांनी केला.
म्हादईच्या पाण्याची शंभर टक्के हमी दिल्यास राजकीय संन्यास घेऊ…!
गेल्या काही दिवसापासून आपण पक्ष बदलणार असल्याच्या अफवा उठविल्या जात आहेत. म्हादईचे पाणी गोव्याला शंभर टक्के वळविण्याची हमी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे राज्यसरकार देत असल्यास, तसेच केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक सरकारला दिलेले सर्व लेखी परवानापत्रे मागे घेत असल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हानही सुदिन ढवळीकर यांनी सरकारला दिले आहे. सध्या गोव्याचे 27 टक्के पाणी वळविण्यात आले आहे. भविष्यात संपूर्ण म्हादईच वळविण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी गोमंतकीयांनी परस्परातील मतभेद विसरून एकसंघ होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खडपाबांध-फोंडा येथील रस्ता खुला करा
फोंडा पालिकेने कवळे व खडपाबांध भागाला जोडणारा खडपाबांध येथील अंतर्गत रस्ता लोकांच्या सोयीसाठी त्वरित खुला करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या रस्त्याची जागा सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे बऱयाच वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र त्यावेळच्या पालिका प्रशासनाने तेथे घरे बांधण्यासाठी ना हरकत दाखले कुठल्या आधारावर दिले, असा प्रश्न उपस्थित करीत फोंडा पालिका व दक्षिण गोवा पीडीए त्याला जबाबदार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून कवळे व फोंडा भागातील लोक या कच्चा रस्त्याचा वापर करीत आले आहेत. हा रस्ता बेकायदेशीर नसून घरे बांधण्यासाठी या जागेचा बेकायदेशीर मार्गाने वापर झालेला आहे. हा रस्ता हलकी वाहने व पादचाऱयांसाठी त्वरित खुला करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.