सोनाळ गावाचा संपर्क तुटला, अनेक घरांमध्ये पाणी
प्रतिनिधी / वाळपई
कर्नाटक भागातील घाट परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसामुळे म्हादई नदीच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली व त्याचे प्रतिकूल परिणाम अनेक गावांना भोगावे लागले. सावर्डे सत्तरी येथील सोनाळ या ठिकाणी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे सोनाळ गावाचा संपर्क वाळपई शहरापासून तुटला . गांजे याठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाळपई फोंडा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली.
कर्नाटक भागातील कणकुंबी घाट परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती .यामुळे नद्यांच्या दोन्ही भागामध्ये असलेल्या कुळांगात, घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसले असून चार सावर्डे येथील अनेक घरांमध्ये पाणी गेल्याची बातमी हाती आली आहे. जवळपास सहा तास पाण्याची पातळी धोकादायक अवस्थेत होती. यामुळे या भागातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात भीती निर्माण झाली होती.
दुसरी महत्त्वाची बाब अशी की वाळपई सोनाळ दरम्यानच्या तार या ठिकाणी जवळपास शंभर मीटर रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे सोनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे वाळपई शहरापासून तुटला. यारस्त्यावर एक मीटरपेक्षा जास्त पाणी भरले होते. काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे पाऊस पडल्यामुळे सोनाळ गावाचा संपर्क शहरापासून पूर्णपणे तुटला होता. सोनाळ याठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये पाणी घुसले होते. त्याचप्रमाणे सदर भागातील अनेक रस्त्यावर पाण्याचा साठा झाल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. गांजे येथील बागायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसण्याचे प्रकार झाले. त्याचप्रमाणे गांजे या ठिकाणी रस्त्यावर पाणी साठा झाल्यामुळे वाळपई फोंडा दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले होती. संध्याकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली असलीतरी घाटमाथ्यावर अजूनही पावसाचे गडद चिन्ह दिसत असल्यामुळे पुन्हा एकदा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.