प्रतिनिधी / पणजी :
विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती निश्चित करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. म्हादई, नागरिकत्व कायदा, अमलीपदार्थ, कायदा सुव्यवस्था या विषयावरुन सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली तर नागरिकत्व कायद्यामुळे देशभरात गोंधळ निर्माण झाल्याचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
गुरुवारी विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. दि. 3 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱया पाच दिवशीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती निश्चित करण्यात आली. मगो आणि गोवा फॉरवर्ड या पक्षानाही बरोबर घेऊन सरकारची कोंडी करण्याची काँग्रेसची रणनिती आहे.
अपक्ष, अन्य पक्षांच्या सहकार्याने विषय हाताळणार
विधानसभेत कोणत्या महत्त्वाच्या विषयावर भर द्यावा यावर चर्चा झाली. म्हादईचा विषय हा महत्त्वाचा आहे. नागरिकत्व कायदा, कायदा सुव्यवस्था तसेच राज्याची आर्थिक स्थिती या मुद्यावर विरोधी पक्ष भर देणार आहे. अन्य पक्ष व अपक्ष यांच्या सहकार्याने विधानसभेत विषय हाताळले जातील, असे कामत यांनी सांगितले. म्हादईचा विषय काँग्रेसने सुरुवातीपासून लावून धरला आहे. म्हादई जागोर काँग्रेसने सुरु केला. इतरांनी हा विषय आता सुरु केला आहे. गरज भासल्यास पुन्हा रस्त्यावर येण्यास कमी करणार नाही, असेही ते म्हणाले.
नागरिकत्व कायद्यामुळे देशात वातावरण बिघडले : राणे
नागरिकत्व कायद्याचा परिणाम गोव्यावर होणार नाही मात्र सरकारच्या निर्णयामुळे देशभरातील वातावरण बिघडले असल्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सांगितले. सरकार हे लोकांचे कल्याण करण्यासाठी असते. देशात अडाणी, अशिक्षित लोक आहेत. महत्त्वाचे अनेक विषय आहेत ते सोडवायला हवेत. नको ते विषय उकरुन काढून लोकांना अडचणीत आणणे योग्य नव्हे, असे राणे म्हणाले. या देशाची घटनाही त्यांनी यावेळी सांगितली.