म्हापसा पालिकेत झालेल्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / म्हापसा
गणेश चतुर्थी झाल्यानंतर गणेश विसर्जनबाबत म्हापसा मतदार संघातील म्हापसा बाजारपेठ तसेच भोवताल परिसरातील सर्व गणेश मंडळ अध्यक्ष, नगरसेवक व सेवाभावी संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या नेतृत्वाखाली होऊन म्हापशात यंदा यंदा सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपापल्या वॉर्डातील गणपती तासतासाच्या अवधीनंतर सुरक्षित अंतर ठेवून म्हापसा तार नदी, श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ उभारण्यात येत असलेल्या खास डबक्यात किंवा घरी आपल्या पिंपामध्ये पाणी साठवून करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सायं. 6 ते 7 या दरम्यान वॉर्ड क्र. 9,10,13,19 यात आंगण, अन्साभाट, फेअर आल्त, मरड व केणीवाडा, सायं. 7 ते 8 वॉर्ड क्र. 14,15,16,17,18 खोर्ली म्हापसा, रात्री 8 ते 9 पर्यंत वॉर्ड क्र. 5, 6, 11,12 यात आल्तो धुळेर, डांगी कॉलनी, धुळेर, गणेशपुरी, आल्तीन, दत्तवाडी एकतानगर, लक्ष्मीनगर यांचा समावेश असेल. रात्री 9 ते 10 पर्यंत वॉर्ड 3,7 व 20 यांचा समावेश असून त्यात करासवाडा, शेटय़ेवाडा, गावसवाडा यांचा समावेश असल्याची माहिती नगरसेवक संदीप फळारी यांनी यावेळी दिली.
दरम्यान वॉर्ड क्र. 1 व 2 कुचेली येथील गणेशमूर्ती साखळेश्वर देवस्थान कुचेलीच्या तळीत व वॉर्ड क्र. 4 व 8 येथील काही गणेशमूर्ती करासवाडा, आकय, कामरखाजन येथील आकय येथील तळीत विसर्जित करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक सुशांत हरमलकर, फ्रँकी कार्व्हालो व शेखर बेनकर यांनी दिली.
माटोळीचा बाजार वेगवेगळय़ा ठिकाणी
दरम्यान यावेळी बोलताना नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी सांगितले की यंदा माटोळीचा बाजार प्रत्येक मतदारसंघात लागणार आहे. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी पुढाकार घेऊन कळंगूट तसेच शिवोली, वेर्ला काणकासाठी वेर्ला काणका पंचायत क्षेत्रात काणका सर्कल जवळ, हळदोणा येथे बाजारपेठेत ग्लेन टिकलो, साळगाव येथे जयेश साळगावकर, शिवोली येथील लोकांसाठी आगरवाडा येथे तर म्हापसा वासियांसाठी म्हापसा बोडगेश्वर मंदिरनजीक खुल्या जागेत माटोळीचे सामान बाजार भरण्याचे ठरविण्यात आले आहे.
नगरसेवक राजसिंग राणे, तुषार टोपले, सुधीर कांदोळकर, स्वप्नील शिरोडकर, शेखर बेनकर, सुशांत हरमलकर, फ्रँकी कार्व्हालो या नगरसेवकांनी या बैठकीत नगराध्यक्षाबरोबर चर्चेत भाग घेतला.
म्हापसा सार्वजनिक गणपती पाच दिवस ठेवल्याने प्रश्नचिन्ह
गोवा मुक्तीनंतरचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून परिचित असलेल्या म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाने मागच्या आठ दिवसापासून आपलेच निर्णय आपण बदलून यू टर्न घेण्यास सुरुवात केली आहे. मागच्या गुरुवारी पालिकेमध्ये झालेल्या बैठकीत म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दीड दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी घोषणा वरीष्ठ विश्वस्ताने केली होती. त्यावेळी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी या मंडळाचे अभिनंदन केले होते. म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धरतीवर गणेशपुरी येथील 21 दिवसाचा श्री गणेश दीड दिवस, अन्साभाट येथील सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस, कन्नड समाजातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस अशा प्रकारच्या घोषणा झाल्या होत्या. पण आज सहाव्या दिवशी पालिकेमधील नगराध्यक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोना महामारीचे संक्रमण वाढत असताना व आपला गणेशोत्सव म्हापसा पालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साजरा होत असून याची पूर्ण कल्पना असून सुद्धा म्हापसेकरांच्या जीवाशी खेळ मांडत आपला सार्वजनिक गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.
नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी म्हापसा गणेशोत्सवाला सांगितले पालिका किंवा पोलीस या काळात सहकार्य करू शकतील की नाही याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. या विषयावर म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूर्ण जबाबदारी घेतली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत आहे याची जाणीव विश्वस्त मंडळाला आहे. आम्ही आमची जबाबदारी ओळखून गणेशोत्सव साजरा करणार आहे असे उत्तर वरिष्ठ पदाधिकाऱयाने यावेळी बैठकीत दिले.
म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोना महामारीमुळे दीड दिवस साजरा करावा यासाठी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी विश्वस्त मंडळाकडे चर्चा करून प्रयत्न केले होते. कोरोनाच्या संक्रमणामुळे म्हापशातील जनतेची सुरक्षा महत्त्वाची आहे. बाजारपेठ असल्यामुळे दररोज शेकडो नागरिक दर्शनासाठी येणार आहे तेव्हा या संक्रमणाचे कोणी बळी पडू नये यासाठी आमदारांनी प्रयत्न केले पण म्हापसा गणेशोत्सव मंडळाच्या विश्वसानी आमदाराचा प्रस्ताव फेटाळून लावला व आपला पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. अशा प्रकारची घोषणा सुद्धा आजच्या बैठकीत विश्वस्त अध्यक्षांनी नगराध्यक्षाच्या कार्यालयात केली.
अशाच प्रकारची विनंती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केली होती. पण म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत आपले निर्णय बदलण्यासाठी दोन वेळा बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत दीड दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आलेल्या दबावावा बळी पडून म्हापसेकरांच्या आरोग्याशी खेळ मांडणारा दुसरा निर्णय घेतला.
या बैठकीत भाई पंडित, सुधीर कांदोळकर, राजसिंग राणे, दिपक म्हाडेश्री, शेखर बेनकर, तुषार टोपले, संदीप फळारी, गौरीश केणी, प्रवीण आसोलकर, सुशांत हरमलकर, आनंद भाईडकर आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.