सत्ता आल्यास पेट्रोल दर 60 रुपयांवर आणू : प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आश्वासन
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात आज पेट्रोल दर गगनाला भिडल्यामुळे समान्य जनतेला जगणेही मुश्किल बनले आहे. पूर्वी आंतराष्ट्रीय स्तरावर बॅरलचा दर 130 डॉलर होता. तेव्हा काँग्रेस सरकारनेच ते खाली आणले होते. देशात आणि राज्यात पेट्रोल दर पुन्हा एकदा 60 रु. प्रती लिटरवर आणण्यासाठी जनतेने एका विचाराने काँग्रेसला सत्तेवर आणावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हापसा येथे केले.
म्हापसा पालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर व विकास आरोलकर यांनी सुमारे 200 कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. म्हापसा येथील उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, ऍड. कार्लूस डिसोझा, उपाध्यक्ष बाबी बागकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, सुधीर कांदोळकर, ऍड. आल्वारीस, विजय भिके, दत्ताराम पेडणेकर, हिमांशू तिवरेकर, म्हापसा गटाध्यक्ष ऍड. शशांक नार्वेकर, प्रल्हाद पाणशीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जनता भाजपसोडून काँग्रेसकडे वळली
चोडणकर पुढे म्हणाले, काँग्रेसही सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणार पक्ष आहे. काँग्रेसने देशात सदैव शांतता नांदण्यासाठी कार्य केले आहे. तसेच सर्वांना प्रोत्साहन व उन्नती साधण्यासाठी सहकार्य केले आहे. मात्र भाजपने अहिंसेचा मार्ग अवलंबलेला आहे. भाजपमध्ये मोदी शहा सांगतात तेच ऐकले पाहिजे, अशी स्थिती आहे. आगामी निवडणुकीत भाजप दुहेरी आकडा गाठणार नाही. त्यांना एक अंकी स्थानावरच ठेवण्याचे ठरविले आहे. जनतेला भाजपपासून होणार त्रास कमी करण्यासाठी पेट्रोलदर व महागाई कमी करण्यासाठी सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले.
आमदारांकडून नेहमीच दुर्लक्ष : तारक आरोलकर
काँग्रसमध्ये प्रवेश केलेले तारक आरोलकर म्हणाले की, समान्य जनतेची कामे होण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भारत देश सुपरपॉवर बनण्यासाठी काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकेल. आमदार ग्लेन टिकलो यांच्याकडून विकासाच्या बाबतीत कधीच साथ मिळाली नाही. त्यांचे म्हणणे आहे की, माझ्याकडून कोणतेही प्रस्ताव दिले गेले नाहीत. मात्र माझ्याकडून लेखी 9 तर पालिकेकडून 23 प्रस्ताव लेखी स्वरुपात दिले गेले आहेत. मात्र त्याकडे कधीही पाहिलेले नाही.
काँग्रेसची तत्वे सांभाळा : अमरनाथ पणजीकर
आरोलकर बंधू भाजपात गेले होते त्याच दिवशी आम्हाला कळून चुकले होते, भाजपची संस्कृती काय आहे. काँग्रेसमध्ये सन्मान देतात तसा भाजप कधीच देऊ शकला नाही. हे त्यांना लवकरच कळले म्हणून ते माघारी फिरून काँग्रेसमध्ये आले. पक्षाची तत्वे काय असतात ते सर्वांना दाखवून द्या, असे आवाहन अमरनाथ पणजीकर यांनी केले.
उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके म्हणाले, यापुढे काँग्रेस पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी आरोलकर बंधूंनी पक्षात स्थीर राहवे. राज्यात काँग्रेसशिवाय पर्याय नाही. म्हापसा पालिकेवर काँग्रेसच झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर तर आश्विन डिसोझा यांनी आभार मानले.