प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा अर्बन बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे मोठय़ा प्रमाणात बँकेचा आर्थिक व्यवहार कर्जाच्या बुडीत खात्यात जमा झाला आहे. या बँकेत अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत. या बँकेवर लवण्यात आलेल्या निर्बंधाची समयसिमा येत्या 18 रोजी संपुष्टात येत असून आता खातेधारकांचे भविष्य रामभरोसे आहे. आमचे पैसे नाहक अडवून ठेवण्यास भाग पाडणाऱया म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची भारतीय रिजर्व्ह बँकेने कसून चौकशी करावी त्याचबरोबर त्यांची संपत्ती जप्त करावी अशी मागणी बँकेच्या खातेदार तसेच ठेवीदारांनी म्हापसा येथे बोलताना केली. येथील बँक मुख्यालयाच्या दरवाजासमोर खातेदार व ठेवीदारांनी मुक धरणे धरली. यावेळी बँकेच्या बेशिस्त कारभाराचा निषेध करणारे फलक धरण्यात सामील झालेल्या खातेधारक तसेच ठेवीदारांनी हातात धरून संचालक मंडळाचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान म्हापसा अर्बनच्या चुकीच्या धारणांमुळे मोठय़ा प्रमाणात बँकेचा आर्थिक व्यवहार कर्जाच्या बुडीत खात्यात जमा झाल्यामुळे 24 जुलै 2015 पासून भारतीय रिजर्व्ह बँकेकडून म्हापसा अर्बनवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले होते. ही आर्थिक निर्बंधाची समयसिमा येत्या 18 फेब्रुवारीला संपत येत असल्याने आता यापुढे तीन लाख खातेधारकांचे भविष्य राम भरोसे असल्याचे उपस्थितांनी सांगितले. रिजर्व्ह बँकेकडून आर्थिक घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ज्यापद्धतीने अन्य बँकांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबिण्यात आले त्याच पद्धतीची कारवाई म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळांवर करण्याची जोरदार मागणी यावेळी खातेधारक तसेच ठेवीदारांकडून करण्यात आली. बँकेवरील आर्थिक निर्बंधामुळे सामान्य जनतेचा तसेच लाखो खातेधारकांचा कष्टाचा पैसा वसूल करून घेण्यासाठी राज्यातील सर्वच्या सर्व म्हापसा अर्बन बँकेच्या दरवाजात अशाचप्रकारे रिजर्व्ह बँकेकडून म्हापसा अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांवर सिईओ अथवा विशेष प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी केली.