अतिक्रमणाचा विळखा घट्ट, ग्रामस्थांतून संताप
वार्ताहर / म्हासुर्ली
म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या सुमारे सात एकर गायरान जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले असून गेल्या दोन- तीन दिवसांपासून या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांची एक प्रकारे झुंबड उडाली आहे. परिणामी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत सर्व अतिक्रमीत जागेची पाहणी केली आहे. मात्र अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कोणत्या उपाय योजना आखणार याकडे सर्व धामणी खोऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
म्हासुर्ली गावा हे धामणी खोऱ्यातील बाजार पेठेचे प्रमुख केंद्र असून राधानगरी तालुक्यातील संवेदनशील गावा पैकी एक आहे. म्हासुर्ली- कळे या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस असणारा गट क्रमांक ८० हा गावातील गुराढोरांच्या चराईसाठी राखीव गायरान जमीन म्हणून उल्लेखीत असणारा सुमारे अकरा एकरांचा भूखंड आहे. यातील चार एकर क्षेत्र हे तुळशी धरणातील धरणग्रस्तांना वाटप केले आहे. तर उर्वरीत जागेपैकी सुमारे सात एकर जमीन ग्रामपंचायतीच्या आखत्यारित येत आहे. तसेच या पैकी काही गायरान क्षेत्रावर सुमारे तीस वर्षांपूर्वी बेघरांच्यासाठी शासनाने सुमारे १५ घरे बांधून वसाहत स्थापण केली आहे. तर थोड्या जागेत गावची स्मशानभूमी उभारली आहे. तसेच सुमारे दोन एकर क्षेत्रावर एका शिक्षण संस्थेने माध्यमिक शाळेच्या इमारतीसह खेळाच्या मैदानासाठी अतिक्रमण केले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून काहींनी या ठिकाणी घरे बांधून संसार थाटला आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून शाळे लगतच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. दोन दिवसात तब्बल पंचवीस लोकांनी शिक्षण संस्थेने शाळेच्या मैदानासाठी अतिक्रमीत केलेल्या मैदानावर ही अतिक्रमण करून अर्धवट अवस्थेतील झोपड्या उभारल्या आहेत. तर नदी काठालगत असणारी स्मशानभूमी ही अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटलेली नाही. आता पर्यत ग्राम प्रशासनाने वाढणाऱ्या अतिक्रमणाकडे फक्त बघ्याची भूमिका घेतली असून केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानली असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून गावातील सुमारे पस्तीस नागरिकांनी या ठिकाणी मनमानी पद्धतीने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून प्रशस्त अशी पक्की घरे बांधली आहेत. मात्र आजपर्यंत त्याच्यावर स्थानिक राजकीय वरदाास्त राहिल्याने कागदी नोटीशी काढण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे .
मात्र येत्या एक दोन दिवसांत कारवाई न झाल्यास उर्वरीत क्षेत्रही अतिक्रमित होऊन मंजूर असणाऱ्या जनावरांचा दवाखाना आणि तलाठी कार्यालय यांच्यासाठी जागा शिल्लक राहणार नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे. परिणामी सर्वसामान्यांत संतापाची लाट उमटली असून त्यातूनच गेल्या दोन दिवसांपासून येथे अतिक्रमण करण्यासाठी झुंबड उडाली असल्याचे बोलले जात असून आता तरी ग्राम प्रशासन डोळे उघडणार का असा सवाल विचारला जात आहे.येथे सध्या सुमार २५ लाकडी शेड उभारली आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाने त मंगळवार सकाळी प्रत्यक्ष अतिक्रमीत गायरानात जाऊन मोजमाप करत पाहणी केली असून पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मंगळवार रोजी राधानगरी तहसिलदार मीना निबांळकर यांनी सदर अतिक्रमीत गायरान क्षेत्राला भेट देत सदर जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे तोंडी आदेश ग्राम प्रशासनला दिले असल्याचे समजते. तरी ग्राम प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्व धामणी खोऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.