आग विझवताना घर मालक जखमी, संसारपयोगी साहित्य जळाले, कुटुंब उघड्यावर
म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली ता राधानगरी येथील धामणी धरण प्रकल्पग्रस्त केरबा वासू वारीक यांच्या घरास शुक्रवारी रात्री वीजेचे शॉर्ट सर्किटने आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले.यात घरातील रोख रक्कमेसह धान्य, सोने, कपडे, वैरण व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आग विझवताना घर मालकाच्या दोन्ही पायानां भाजून गंभीर जखम झाली आहे.
केरबा वारीक यांचे मुळगाव राई (ता राधानगरी ) असून ते धामणी प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्त असून त्यांचे सुमारे दहा वर्षापूर्वी म्हासुर्ली येथे पुनर्वसन झाले आहे. ते सध्या मिळालेल्या शेत जमिनीत घर बांधून राहत होते. मात्र शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास अचानक घरातील वीजेच्या वायर मध्ये शॉर्टसर्किट होऊन घरास आग लागली.क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले.
घरात जनावरांच्या वैरणीचे वाळके गवत भरुन ठेवल्यामुळे क्षणातच संपूर्ण घराला आगीने वेढले.यावेळी वारीक यांनी आरडाओरड करून शेजारी राहणाऱ्या दगडू चौगुले यांच्या घरातील माणसांना बोलविले. तसेच घरातील लहान मुलासह महिलांना त्यांनी धाडसाने बाहेर काढले. तर शेजारील दगडू चौगुले यांनी घरातील गोठ्यात असणाऱ्या जनावरांची दावी कापून त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.आगीच्या रौद्र रूपामुळे आग विझवणे अशक्यप्राय झाल्याने, घरातील वैरण, पावसाळ्यासाठीचे सरपण, भात, गहू, तांदूळ, नाचणी, आदी धान्यासह कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडी, तिखट, रोख रक्कम, सोने आदी सर्वकाही जळून खाक झाले.परिणामी या ओढवलेल्या प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.
सदर घटनेचा मंडल अधिकारी देविदास तरडे, तलाठी विजय पाटील, पोलीस पाटील भरत पांडव, सुनील हुंबे आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या घटनेचा पंचनामा केला असून आगीत सुमारे साडेआठ लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगितले.