राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष मुकेश सारवान यांची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
म्हेतर समाज आजपर्यंत स्वच्छतेच्या माध्यमातून देशसेवा करत आला आहे. मात्र, राजकारणात समाजाला कधी प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने समाजाला विधीमंडळात प्रतिनिधीत्व देऊन समाजाचा सन्मान करावा अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष मुकेश सारवान यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजाचे प्रश्न समाजावून घेण्यासाठी सारवान पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी आयोजित म्हेतर समाज्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.
ते म्हणाले, राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या माध्यमातून समाजासाठी अनेक योजना राबवल्या, ५० लाखांपर्यंत विमा संरक्षण ही महत्वपूर्ण योजना लागू केल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळालेला आहे. आता उर्वरीत प्रश्न सोडवण्यासाठी आपापसातील मतभेद बाजुला ठेवण्याची गरज आहे. आपली एकसंघ ताकद सरकारला दिसली पाहिजे. माथाडीच्या धर्तीवर म्हेतर, सफाई कर्मचाऱ्यांना बोर्ड स्थापन झाले पाहिजे. महात्मा फुले महामंडळाकडून कर्ज योजन सुरु झाली पाहिजे. यासाठी सध्या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. आघाडी सरकार या मागण्या पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
उपेक्षित दलित सामाजिक परिषदेचे कार्याध्यक्ष सुरेश तामोद यांनी समाजाल भेडसावत असलेले प्रश्न मांडले ते म्हणाले, वाल्मिकी म्हेतर, रोकी, मकियार, मालखाना, तेलगू, मुस्लिम म्हेतर, या सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. समाज विखुरल्याने प्रश्न सुटत नाहीत. सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे मालकी हक्काने द्यावीत असा शासन निर्णय झालेला आहे. मात्र अद्याप ताबा मिळालेला नाही. आमच्या मुलांना जातीचा विचार न करता गुणवत्तेवर नोकरी मिळाली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला अर्थसहाय्य मिळाले पाहिजे. आदी मागण्या मांडल्या.
यावेळी मणुष्यबळ लोकसेवा अकादमीने समाजरत्न पुरस्कार दिल्याबद्दल सुरेश तामोत यांचा सारवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच बरोबर स्केटींगपट्टू वेदिका वाळवेकर हिचा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी सचिन पंडित, भगवान सकाते, नितीन कचोटे, राजेश वालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.