कन्नड शाळांचे मराठी शाळांमधील स्थलांतर थांबविण्याची मागणी : अतिथी शिक्षक नेमणुकीचे शिक्षणाधिकाऱयांनी दिले आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण विभागाची मराठी शाळांवर वक्रदृष्टी असल्यामुळे कन्नड शाळा मराठी शाळांमध्ये स्थलांतरित करून मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. गणपत गल्ली येथील शाळेमध्ये अशाच प्रकारे कन्नड शाळा घुसडण्यात येत असल्याचा प्रकार झाल्याने बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी गट शिक्षणाधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. कन्नड शाळांचे जाणीवपूर्वक केले जाणारे स्थलांतर वेळीच थांबवावे. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱयांनी शिक्षण विभागाला दिला.
गणपत गल्ली येथील शाळा क्रमांक 2 मध्ये महात्मा फुले मार्केट (कांदा मार्केट) येथील कन्नड शाळेचे मागील 8 दिवसांपासून स्थलांतर करण्यात आले आहे. कन्नड शाळेला प्रशस्त जागा असतानाही पावसाचे कारण देत ती मराठी शाळेत स्थलांतरित करण्यात आली आहे. यापूर्वी फुलबाग गल्ली येथेही असाच प्रकार झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी शहर व ग्रामीण गट शिक्षणाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. यावेळी सदर कन्नड शाळा तात्पुरती हलविण्यात आली असून, ती इतरत्र स्थलांतरित केली जाईल, असे आश्वासन शहर गटशिक्षणाधिकाऱयांनी दिले.
सांबऱयात शिक्षकांची कमतरता
विद्यार्थी कमी असल्याने मराठी शाळा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. परंतु सांबरा येथील मराठी शाळेत 200 विद्यार्थी असूनही केवळ 4 शिक्षकांवर शाळा चालविली जात आहे. मुख्याध्यापक नसल्याने प्रभारींवर कारभार सुरू असल्याने महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी जाब विचारला. यावेळी ग्रामीण गट शिक्षणाधिकाऱयांनी हतबलता व्यक्त करत शिक्षक भरती नसल्याने शिक्षक नसल्याचे सांगितले. या शाळेत अतिथी शिक्षक नेमणुकीचे आश्वासन शिक्षणाधिकाऱयांनी दिले.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, प्रिया कुडची, सूरज कणबरकर, अजित कोकणे, वासू सामजी, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
‘तरुण भारत’ने फोडली वाचा
मराठी शाळा संपविण्यासाठी शिक्षण विभागाकडून नेहमीच प्रयत्न केला जातो. शाळा संपल्या तर मराठीचे अस्तित्व राहणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मराठी शाळांना सुविधाच न पुरविणे, शिक्षकांची कमतरता ठेवणे, भरतीला स्थगिती, शाळांचे विलीनीकरण असे प्रकार करण्यात येत आहेत. गणपत गल्ली येथील शाळेमध्ये कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळताच ‘तरुण भारत’ने याला वाचा फोडली. ‘तरुण भारत’ने सर्वप्रथम बातमी देत आवाज उठविल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात
आले.