प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व देसूर येथील रहिवासी जोतिबा आप्पय्या पाटील (वय 72) यांचे बुधवार दि. 16 रोजी हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, एक चिरंजीव, तीन विवाहित कन्या, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड कमिटीचे ते सदस्य होते. देसूर परिसरातील खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. सीमालढय़ामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
सीमाप्रश्नाच्या लढय़ाबरोबरच इतर सामाजिक कार्यामध्येही त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. माऊली देवी सहकारी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. रेणुकादेवी कृषी पत्तीन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहत होते. माऊली मंदिर जीर्णोद्धार मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे म. ए. समितीबरोबरच देसूर पंचक्रोशीचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी 8 वा. रक्षाविसर्जन होणार आहे.