दोड्डहोसूर, निडगल, तोपिनकट्टी, हडलगा, खैरवाड या ठिकाणी समितीच्या बैठकींना प्रतिसाद
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आठ प्रतिनिधींच्या तालुका दौऱयाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून समितीप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागृती बैठकातून युवक व ज्येष्ठ नागरिकांकडून समितीला भरघोस पाठिंबा व्यक्त करण्यात येत असून म. ए. समितीची विस्तृत कार्यकारिणी निवडण्यासाठी गावातून एकमुखाने नावे देण्यात येत आहेत. त्यामुळे समितीच्या पुनर्बांधणी व एकीच्या या प्रक्रियेला निश्चितच यश मिळणार असल्याची प्रतिक्रिया समितीप्रेमी नागरिक व्यक्त करत
आहेत.
दोन्ही समितीच्या एकीकरणाची प्रक्रिया निश्चित झाल्यानंतर म. ए. समितीची तालुकास्तरीय विस्तृत कार्यकारिणी करण्यासाठी मध्यवर्ती समितीने आठ प्रतिनिधींची नियुक्ती केली असून या आठ प्रतिनिधीनी तालुक्यात जोरदार दौऱयांना सुरुवात केली आहे.ऐन सुगीचा हंगाम असूनदेखील ग्रामीण भागातील नागरिक या बैठकांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहून समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत आहेत. गेल्या तीन दिवसात तालुक्यातील निडगल, तोपिनकट्टी, दोड्डहोसूर, खैरवाड, हडलगा या गावातील दौऱयातून नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला असून कार्यकारिणी निवडीसाठी प्रत्येक गावातून चार-चार नावे देण्यात आली
आहेत.
या दौऱयात परशराम कोलकार, मधू पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, गोपाळ तिवोलकर, देवाप्पा पाटील, विराप्पा पाटील, जयंत पाटील हे दोड्डहोसूर येथे नागरिक उपस्थित होते. तर निडगल येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी तानाजी कदम होते. यावेळी दिगंबर देसाई, परशराम कदम, राजू कदम, यल्लाप्पा कदम, प्रवीण कदम, महेश कदम, मनोहर गुंजीकर, परशराम अल्लोळकर आदीनी समितीला पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे केली. आणि समितीच्या पाठिशी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तर तोपिनकट्टी येथील महादेव मंदिरात झालेल्या बैठकीत कृष्णा उत्तूरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी महेश करंबळकर, मऱयाप्पा उसगावकर, हुवाप्पा गुरव, नागराज निलजकर, देवाप्पा गुरव, बाबाजी देसाई, अशोक गुरव, वैजू खांबले, मल्हारी खांबले, आप्पा हलगेकर यांनी समितीच्या बैठकीसंदर्भात विचार व्यक्त केले.
खैरवाड-हडलगा गावांतून एकमुखी पाठिंबा
खैरवाड येथील झालेल्या बैठकीत खानापूर तालुका समितीला एकमुखी पाठिंबा देण्यात आला. परशराम भुजगुरव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी परशराम असोगेकर, प्रवीण कोलेकर, जोतिबा वाकाले, कल्लाप्पा बावकर, परशराम बावकर, अप्पाण्णा गुरव, गौराप्पा गुरव, मारुती असोगेकर, गोपाळ भुजगुरव, नागाप्पा पाटील, दत्तू गुरव यांनी समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून सीमाप्रश्नाच्या चळवळीत सक्रिय राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी हडलगा येथे झालेल्या बैठकीत व्यंकोबा ओऊळकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी शंकर येळळूरकर, गणपती मडवाळकर, रविंद्र खानापूरकर, कृष्णा खानापूरकर, पी. जी. काद्रोळकर, तुकाराम खानापूरकर, विनायक ओऊळकर, लक्ष्मण खानापूरकर, जयंत खानापूरकर यासह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी हडलगा गावातून समितीला एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.