प्रतिनिधी /खानापूर
कै. सीमासत्याग्रही नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी नर्मदा होसूरकर व समिती नेते नारायण मल्लाप्पा पाटील कुप्पटगिरी यांना खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे त्यांच्या निधनाबद्दल निडगल येथे शोकसभेचे आयोजन केले होते. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एम. पी. कदम होते.
प्रास्ताविक गणपतराव पाटील यांनी केले. कै. नर्मदा होसूरकर व कै. नारायण मल्लाप्प्पा पाटील यांच्या फोटोचे पूजन समितीचे नेते पुंडलिक चव्हाण व खानापूर ता. म. ए. समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील, सीमासत्याग्रही नारायण लाड, मार्केटींग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रविण पाटील यानी केले. कै. नर्मदा होसूरकर यांच्या प्रतिमेस पुंडलिक चव्हाण व नारायण लाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, 1956 साली भाषावार प्रांतरचना झाल्यावर सीमालढा सुरू झाला. त्यावेळी पोलिसांच्या मारहाणीत समिती कार्यकर्ते नागाप्पा होसूरकर यांचा हिंडलगा कारागृहात मृत्यू झाला. त्यावेळी कै. नर्मदा नागाप्पा होसुरकर यांचे लग्न होऊन चार-पाच महिनेसुद्धा झाले नव्हते. गेली 66 वर्षे आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वैधव्यात घालविले. त्यांनी शेवटपर्यंत सीमाप्रश्नाचा ध्यास घेतला होता. कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या वारसदारांना महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन मिळवून दिली, पती निधनानंतर नर्मदाबाईनी आपल्या माहेरी निडगल येथे आपले उर्वरित आयुष्य घालवले. अशा या थोर सीमा तपस्विनी नर्मदाबाई&ंचे निधन 10 मार्च रोजी निडगल मुक्कामी झाले. अशा थोर भगिनीला खानापूर ता. म. ए. समितीतर्फे दिगंबर पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. कुप्पटगिरीचे ज्येष्ठ नेते नारायण मल्लाप्पा पाटील यांचे 11 मार्च रोजी कुप्पटगिरी येथे निधन झाले. त्यांनाही श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पुंडलिक चव्हाण व नारायणराव लाड यांनी अनुभवाचे कथन केले. या प्रसंगी जि. पं. चे माजी सदस्य जयराम देसाई, माजी जि. पं. सदस्य विलासराव बेळगावकर, म. ए. समितीचे आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, माजी नगरसेवक अनिल पाटील, माजी नगरसेवक विवेक गिरी, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पीकेपीएस सोसायटीचे संचालक शंकर पाटील, माजी ता. पं. सदस्य विठ्ठल गुरव, महादेव घाडी, गोपाळ देसाई, बाबुराव पाटील, प्रकाश चव्हाण, राजू पाटील नंदगड इत्यादीनी श्रद्धांजली वाहिली. अध्यक्षीय भाषणात एम. पी. कदम यांनी श्रद्धांजली वाहिली.
समिती कार्यकर्ते शामराव पाटील, रुमक्माण्णा झुंजवाडकर, विश्वास पाटील, तानाजी कदम, राजाराम पाटील, दिगंबर देसाई, शशिकांत कदम, नागेश चोपडे, सुरेश चोपडे, परशराम कदम, अरुण पाटील तसेच निडगल व कुप्पटगिरी गावचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.