मजुरांचा तुटवडा, यंत्रामुळे कामे लवकर मात्र खर्च वाढल्याने शेतकऱयांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
आधुनिक यंत्राच्या साहाय्याने आता शेतीतील कामे सुलभ होत आहेत. मजुरांच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी या आधुनिक यंत्रांचा वापर होत असला तरी होणारा खर्च आणि निघणारे उत्पन्न यामध्ये मात्र तफावत वाढत चालली आहे. अधिक मेहनत आणि वेळ न लागता कामे होत असली तरी खर्चाचा ताळमेळ मात्र जमने कठीण झाले आहे. भात कापणी, मळणी, कडधान्य पेरणी यामध्ये अलिकडे अमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना एका बाजूने फायदा झाला तरी खर्चाचा विचार केला तर एक प्रकारे फटकाच बसू लागला आहे. आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेती करणे सोपे असले तरी खर्चिक ठरु लागल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.
भात कापणी करण्यासाठी आतापर्यंत मजुरांचाच उपयोग केला जात होता. पैरा पद्धतीने भात कापणी होत होती. मात्र आता केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास आपली प्रगती होत नाही याचबरोबर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जमिनींचे आकारमान देखील कमी होवू लागले आहे. त्यामुळे पैरापद्धत बंद झाल्याने मजुरांची समस्या भेडसावू लागली आहे. एक एकर कापणीसाठी किमान 18 मजूर लागतात. मात्र आता यंत्राच्या साहाय्याने केवळ 2 ते 3 तासांमध्ये एक एकर जमीन कापून होत आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. पण पैरा पद्धतीमुळे खर्च कमी लागत होता. यंत्राला मात्र रक्कम मोजावी लागत आहे.
मळणीच्या पद्धतीमध्ये तर गेल्या काही वर्षांमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. खळे करून बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात होती. मात्र आता खळय़ाच्या ठिकाणी ताडपत्रीचा उपयोग होत आहे तर मेटी गायबच झाल्या. बैलांची संख्याही कमी झाल्याने बैलांच्या ठिकाणी ट्रक्टरचा उपयोग होवू लागला आहे. बैलजोडी मालकाला किंवा मजुराला केवळ दीड ते दोन पायली (चार अडीशेर) भात दिले जात होते. मात्र आता मळणीमध्ये झालेल्या भातावरून ट्रक्टर मालकाला भाडे द्यावे लागत आहे. जवळपास 25 पोत्याला हजार रुपयांपेक्षाही अधिक रक्कम आकारली जात आहे.
खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ जमणे कठीण
मळणी झाल्यानंतर भात सुपांच्या साहाय्याने वारे दिले जात होते. मात्र आता मळणी झाल्यानंतर यंत्रामध्ये घालून वारे देण्यात येत आहे. त्यासाठी एका पोत्याला 40 ते 50 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे त्याचाही अधिक भुर्दंड शेतकऱयांना बसू लागला आहे. एकूणच यंत्राच्यासाहाय्याने आता शेतीतील कामे करण्यात आली तरी खर्चामध्ये मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे आधुनिक शेती करताना खर्च मात्र वारेमाप होताना दिसत आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ जमणे कठीण झाले आहे, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे.