नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन संघ आता डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनामुळे आणखी भक्कम झाला असून यामुळे यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा विशेष आव्हानात्मक असेल, असे प्रतिपादन धडाकेबाज भारतीय सलामीवीर रोहित शर्माने केले. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून या मालिकेत तिरंगी टी-20 मालिका, 4 किंवा 5 कसोटी सामने व यादरम्यान आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
भारताने यापूर्वी 2018-19 मधील कसोटी दौऱयात 2-1 असा दणकेबाज विजय संपादन करत 71 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मालिकाविजयाचा पराक्रम गाजवला होता. पण, त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघात वॉर्नर व स्मिथ या दोन्ही दिग्गजांचा समावेश नव्हता. हे दोघेही दिग्गज त्या मालिकेदरम्यान एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित होते.
ऑस्ट्रेलियात सलामीला फलंदाजीला उतरणे आव्हान असते. पण, मी त्याचा नेहमी आनंदच लुटत आलो आहे, असे रोहित तेथील अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला. 2018 ऑस्ट्रेलिया दौऱयात कसोटीतही सलामीला उतरावे लागेल, याची मला कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे, माझी त्यासाठी मनोमन तयारी झाली होती आणि ड्रेसिंगरुममधून सामना पाहत राहणे मला कधीच पसंत असत नाही, असे त्याने नमूद केले.