साखर कारखाना मालक संघटनेचा 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय : राज्य सरकारला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा साखर कारखाने एक महिना उशिरा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण भारत साखर कारखाना मंचने (कर्नाटक) घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याचे ठरविण्यात आले असून यासंबंधी राज्य सरकारला निवेदनही पाठविण्यात आले आहे.
उत्तर कर्नाटकातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, खासगी साखर कारखाना मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवषी ऑक्टोबरमध्ये बॉयलर प्रदीपन केला जातो. यंदा मात्र एक महिना उशिरा कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवशक्ती साखर कारखान्याचे डॉ. प्रभाकर कोरे, निराणी उद्योग समुहाचे मुरगेश निराणी, प्रभूलिंगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष जगदीश गुडगुंटी, सतीश शुगर्सचे सतीश जारकीहोळी, गोदावरी साखर कारखान्याचे समीर सोमय्या, रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक विजेंद्रसिंग, विश्वराज शुगर्सचे मुकेश, जेम्सचे जवाहरलाल दोड्डण्णावर, अथणी शुगर्सचे योगेश पाटील, शिरगुप्पी शुगर्सचे डॉ. रमेश दोड्डण्णावर, उगार शुगर्सचे अविनाश शिरगावकर यांच्यासह आयसीपीएल, एम. के. हुबळी, दूधगंगा आदी कारखान्यांचे प्रमुख या बैठकीत उपस्थित होते.
दरवषी ऑक्टोबरमध्ये गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येते. उसाचे उत्पादन पाणी, हवामान, शेतकऱयांचे कष्ट व कारखान्यांचे सहकार्य यावर अवलंबून असते. उत्तर कर्नाटकात डिसेंबर ते मार्चपर्यंत उसाचा उतारा अधिक मिळतो. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केल्यामुळे उसात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उतारा 8 टक्के येतो. फायबरचा अंशही कमी असतो. त्यामुळे वीज उत्पादनही घटते. इथेनॉल उत्पादनही कमी होते. त्यामुळे याचा फटका शेतकऱयांना बसतो.
शासकीय आदेश लागू करणार
या सर्व बाबींचा विचार करून साखर कारखाना चालकांनी बैठक घेऊन यंदा ऑक्टोबरऐवजी 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनीही यासंबंधी शासकीय आदेश लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. कारखानदारांच्या या निर्णयाचे प्रत्येक कारखान्यांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन दक्षिण भारत साखर कारखाना मंचचे अध्यक्ष जगदीश दुडगुंटी यांनी केले आहे.