दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसमोर अडचणी : वितरणाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
दरवर्षी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण केले जाते. मात्र गतवर्षापासून कोरोनामुळे सायकल वितरण थांबले आहे. यंदादेखील शाळा उशिरा सुरू झाल्या आहेत. शिवाय सायकल वितरण करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला नाही. त्यामुळे यंदाही आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेला येणे सोयीस्कर व्हावे, याकरिता शासनाकडून सायकली दिल्या होत्या. दरम्यान ग्रामीण भागात बससेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सायकल वितरित करण्यात येतात. मात्र मागील वर्षापासून सायकल वितरणाला ब्रेक लागला आहे. गतवषी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यानंतर केवळ परीक्षा घेण्यात आल्या आणि यंदाही शैक्षणिक वर्षाला उशिराने प्रारंभ झाला आहे. यामुळे सायकल वितरणाचे काम थांबले आहे. यंदा विद्यार्थ्यांना सायकल मिळेल, अशी आशा होती. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय शिक्षण खात्याकडून झाला नसल्याने सायकल मिळण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न धूसर झाले आहे. दरवषी आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नववी आणि दहावीत सायकलचा वापर होत होता. मात्र गतवर्षीपासून आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल न मिळाल्याने प्रवास कसा करावा, असा प्रश्नही पडला आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अडचणी
डोंगर आणि दुर्गम भागात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना सायकलीचा मोठा लाभ होत होता. मात्र सायकल वितरण न झाल्याने विद्यार्थ्यांना पायी चालत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे तातडीने सायकल वितरण करावे, अशी मागणीही विद्यार्थी करीत आहेत.