तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बधामध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली. यामध्ये यंदाही प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूरला एसटीनेच प्रवास करणार आहेत.
गतवर्षी कोरोनामुळे राज्यातील दहा प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या एसटीने पंढरपुरात आल्या होत्या. अवघ्या 36 तासांचा पंढरपुरातील मुक्काम उरकून आषाढी वारी गतवर्षी संपन्न झाली. त्यावेळी प्रत्येक संतांच्या पादुका संबंधित केवळ वीस वारकऱ्यांना मुभा देण्यात आली होती. यांना मात्र नियमांमध्ये बदल करून राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक संतांच्या पादुकांना दोन एसटी बस आणि चाळीस वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रस्थान सोहळ्यासाठी देखील निर्बंध शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत .
एकंदर आषाढी यात्रेमध्ये प्रमुख संतांच्या पालख्या पंढरपुरात जातील त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन सर्वसामान्य वारकऱ्यांना आणि भक्तांना पूर्णपणे बंद असणार आहे. केवळ पंढरपुरातील रथ उत्सव आणि वाखरी येथील रिंगणासाठी अनेक निर्बंध शासनाच्या वतीने घालण्यात आले आहेत. त्यामुळे इतिहासात परत एकदा निर्मनुष्य अवस्थेत आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.