पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची माहिती
सोलापूर / प्रतिनिधी
प्रातिनिधीक पायी वारीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे इसबावी ते पंढरपूर दरम्यान पायी वारी जाणार आहे. यामध्ये सामाजिक अंतराचे पालन करून भाविकांना ठराविक वेळाने सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने आषाढी वारीबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था होती. वारीची परंपरा कायम राहावी यासाठी अनेक वारकरी मंडळांच्या वतीने राज्य शासनाकडे प्रयत्न चालविले होते. परंतु, भाविकांची संख्या वाढल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच आरोग्य, पोलीस व अन्य यंत्रणेवर त्यांचा मोठा ताण पडतो. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून प्रातिनिधीक वारीस परवानगी देण्यात आली आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसह मानाच्या 10 पालख्यांना परवानगी दिली आहे. वाखरी ते इसबावी यादरम्यान प्रत्येक पालखीतील 40 लोक जातील. येथे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर एक ते दोन प्रतिनिधी वगळता इतर लोक वाहनातून जातील. तसेच प्रत्येक पालखीतील 20 लोकांना इसबावीपासून पंढरपूरपर्यंत पायी जाणार असल्याचीही माहिती अधीक्षक सातपुते यांनी दिली. या पत्रकार परिषेदस अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.