वार्ताहर/ कोगनोळी
सीमाभागात ऊस तोडणी हंगाम सुरु होत आहे. यंदा अतिपावसामुळे उसाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार आहे. त्यातही नजिकच्या महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनीही ऊस घेऊन जाण्यासाठी आतापासून नियोजन केले आहे. त्यामुळे कारखान्यांना कार्यक्षेत्राच्या बाहेरुन उसाची पळवा-पळवी करावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सीमाभागात उसाचे 30 हजार हेक्टर क्षेत्र आहे. येथील ऊस निपाणी, चिकोडी, अथणी, कागवाड तालुक्यांसह नजीकच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्हय़ातील कारखान्यांनी पुरविला जातो. दरम्यान कारखान्यांनी ऊस घेऊन जाण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱयांना ऊस देण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. कारखान्यामध्ये ऊस घेऊन जाण्यासाठी मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. ज्या कारखान्याची यंत्रणा मजबूत असेल त्यांना हा हंगाम अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. एक नोव्हेंबरनंतर खऱया अर्थाने हंगामाला सुरवात होईल. तेव्हा ही स्पर्धा प्रत्यक्षात पहायला मिळणार आहे.
पावसामुळे काही प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले असून त्याचा वजनावर काही अंशी परिणाम होऊ शकणार आहे. परतीच्या तडाख्याने ऊसपीक भुईसपाट झाले आहे. यामुळे ऊसतोड मजुरांकडून तोडणीसाठी शेतकऱयांकडे पैशाची मागणी होण्याची शक्यता आहे. याकडे कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरीवर्ग पर्याय उपलब्ध असल्याने अन्य कारखान्याकडे ऊस पाठविण्यासाठी तयार असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे. याची दखल घेत शेतकऱयांची होणारी पिळवणूक आणि कारखान्याला बसणारा फटका याचा विचार करुन कारखाना अधिकाऱयांनी उपाययोजना हाती घेण्याची मागणी होत आहे.