उत्पादक शेतकरी चिंतेत : वळीव पाऊस – हवामानातील बदलाचा परिणाम
वार्ताहर / किणये
वारंवार होणाऱया वळीव पावसामुळे व हवामानातील बदलामुळे यंदा काजूच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट होणार आहे. यामुळे उत्पादक शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात काजूचे उत्पादन अधिक मिळते. तसेच या दोन महिन्यातच काजूला फळधारणाही जास्त असते. यंदा मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. एप्रिल महिन्यातच काजूची झाडे फळाविना मोकळी दिसू लागली आहेत.
बेळगाव, खानापूरसह चंदगड तालुक्यात काजूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. या काजूच्या उत्पादनावर बहुतांशी शेतकऱयांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. गेल्या महिन्याभरापासून अधूनमधून वळीव पाऊस हजेरी लावत आहे. तसेच वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे काजूच्या झाडांना आलेली फळे गळून पडली आहेत. यंदा हवामानात कमालीचा बदल जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे काजूच्या झाडांना आलेला मोहोर खराब झाला आहे.
सध्या काजूच्या बागांची राखण करण्यात येत आहे. दरवर्षी एप्रिल महिना म्हटले की काजूची झाडे अगदी काजू मुरठय़ांनी बहरलेली असतात. यावर्षी मात्र काजूची फळधारणा अगदीच कमी प्रमाणात झाली आहे. यामुळे काजू उत्पादक शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, राकसकोप, यळेबैल, बोकनूर, बेळवट्टी, बिजगर्णी, इनाम बडस, कावळेवाडी, जानेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, संतिबस्तवाड, रणकुंडये, वाघवडे, झाडशहापूर, उचगाव, बाची, बंबरगे, बसुर्ते, आदी परिसरात काजूच्या बागायती मोठय़ा प्रमाणात आहेत. तीन महिने या भागातील काजू उत्पादक शेतकरी काजूची बाग राखण करण्यात मग्न असतात. काजूला फळधारणा कमी झाली असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त बनलेले आहेत. गतवर्षी काजूला प्रति क्विंटल 8500 ते 9500 असा दर मिळाला होता. हा दरही शेतकऱयांना परवडणारा नव्हता. यावर्षी काजूच्या उत्पादनात घट झाली असल्यामुळे किमान यंदा तरी काजूला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.