जिल्हाधिकारी यांनी केल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत सूचना
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरासह जिह्यात यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव शासनाने दिलेल्या निकषात साजरा करावा.गणेशाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही.रात्री दहा ते पहाटे पाच या दरम्यान जमाव बंदी आदेश असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सूचित केले.गणेश मंडळांना मोजकेच कार्यक्रत्ये घेऊन आरती करता येईल, विसर्जन ठिकाणी आरती करता येणार नाही, अशा ही सूचना त्यांनी दिल्या.गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कायदा पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
पोलीस करमणूक केंद्रात गणेशोत्सव आणि मोहरमच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, यावर्षी कोरोनामुळे सर्वापुढे आव्हान आहे.गणेशोत्सवात गर्दी झाली तर मुंबई पुणे सारखी परिस्थिती होईल.मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे.यामुळे मिरवणूक होणार नाही.आरती करण्यासाठी केवळ पाच व्यक्तींना परवानगी देण्यात येईल.सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन पालिका करेल.मागच्या वर्षी ज्या गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली होती तीच यावर्षी ग्राह्य धरण्यात येईल.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, शासनाच्या निर्णयानुसार घरगुती गणेश मूर्ती 2 फुटांची तर मंडळांची मूर्ती 4 फुटांची राहील, विसर्जन करण्यासाठी पालिकेच्यावतीने ऑन लाईन अर्ज तयार करण्यात येईल मोठय़ा मूर्ती तशाच ठेवा किंवा चार महिन्यांनी विसर्जन करा, मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी नाही असे त्यांनी बजावले.मुख्याधिकारी अभिजित बापट म्हणाले, शक्यतो नागरिकांनी घरगुती गणेश मूर्तीचे घरातच विसर्जन करावे, रस्त्याची डागडुजी करण्यात येईल, असे सांगितले. नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, गणेश मंडळाने अगोदर विसर्जन करण्याची माहिती द्यावी शहरात पंधरा ठिकाणी सोय करण्यात आली आहे.यावेळी अविनाश कदम, धनंजय जांभळे, बाळासाहेब शिंदे, श्रीकांत आंबेकर,राजू गोडसे, संतोष शेंडे, सुनील कोळेकर यांनी अडचणी व समस्या मांडल्या.