ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे राज्यावर आलेले आर्थिक संकट पाहता यंदा आरोग्यसेवा वगळता इतर विभागातील नोकर भरती थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.
कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात किंवा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. प्रत्येक विभागाला यंदा बजेटच्या केवळ 33 टक्केच रक्कम मिळणार आहे.
यंदा शासकीय खर्चात 67 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कोणीही नवीन योजना सादर करू नये. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे प्राधान्य क्रमाचे विभाग ठरवण्यात आले असून, या विभागांनी केवळ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे, असेही वित्त विभागाने आदेशात म्हटले आहे.