प्रतिनिधी / मिरज
गेली शंभर वर्षे ज्या गाडीने महाराष्ट्र-कर्नाटकातील शेकडो वारकऱ्यांना पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाची भेट घडवून आणली ती ‘देवाची गाडी’ यंदा प्रथमच धावणार नाही. लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने आणि पंढरपूरच्या वारीवरही निर्बंध असल्याने दरवर्षी आषाढीच्या दिवसात मिरज रेल्वे स्थानकात होणारी वारकऱ्यांची गर्दी यंदा दृष्टीस पडणार नाही. वारकऱ्यांविना मिरज स्टेशन ओस पडले आहे.
आषाढी एकादशी ही लाखो वारकऱ्यांच्यासाठी पर्वणी असते. या काळात वारकरी पंढरपूरच्या पांडूरंगाला भेटण्याच्या ओढीने पायी अथवा मिळेल त्या वाहनाने जात असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो वारकऱ्यांसाठी मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गावर धावणारी रेल्वे ही यासाठी उपयुक्त ठरली आहे. दरवर्षी या भागातील वारकरी आषाढी एकादशीच्या चार-पाच दिवस अगोदर मिरज रेल्वे स्थानकातून पंढरपूरकडे रवाना होतात. वारकऱ्यांनी खचाखच भरलेली मिरज-पंढरपूर ही रेल्वे गाडी देवाची गाडी म्हणूनच ओळखली जाते.
सन १९२७ साली बार्शी लाईट रेल्वे कंपनीने मिरज ते पंढरपूर ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. आणि त्यानंतर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एका हक्काच्या वाहनाची सोय झाली. या गाडीला वारकऱ्यांची इतकी गर्दी असे की गाडीच्या टपावर बसूनही वारकरी प्रवास करीत. मात्र, नॅरोगेज मार्गावर धावणारी ही रेल्वे अतिशय मंद गतीने धावत असे. तीची गती इतकी मंद असे की चालत्या गाडीतून उतरुन तिच्याबरोबर काही वारकरी गंमत म्हणून चालत आणि पुन्हा गाडीत उडी मारुन बसत. मात्र, या गाडीने हजारो वारकऱ्यांना सावळ्या पांडूरंगाची भेट घडवून आणली. त्यामुळे देवाच्या गाडीचे आणि वारकऱ्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.
सन २००७ मध्ये रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी ही देवाची गाडी काही वर्षे बंद होती. हा अपवाद वगळता देवाच्या गाडीने कधीच विश्रांती घेतली नव्हती. हजारो वारकऱ्यांना पांडूरंगाची भेट घडवून आणण्यासाठी न थकता, न थांबता ही गाडी कायम धावतच असे. आषाढी-कार्तिकीच्या काळात तर वारकऱ्यांची गर्दी पाहता, या गाडीच्या जादा फेऱ्या होत असत.
यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे यंदा प्रथमच मिरज स्थानकातून पंढपूरकडे जाणारी देवाची गाडी धावणार नाही. पंढरपूरच्या वारीवरही निर्बंध आल्याने वारकरीही पंढरपूरकडे जाणार नाहीत. त्यामुळे दरवर्षी या काळात वारकऱ्यांना गजबजलेले मिरज रेल्वे जंक्शन सध्या ओस पडले आहे. ज्या रेल्वे स्थानकावर आषाढी एकादशीच्या काळात टाळ-मृदंगाचे आणि विठ्ठल नामाचे जयघोष ऐकू येत त्या मिरज रेल्वे स्थानकावर सध्या शुकशुकाट आहे.