नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेला दि. 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी केली. 2021-22 हंगामात सर्व वयोगटातील प्रथमश्रेणी स्पर्धांच्या माध्यमातून एकूण 2127 सामने खेळवले जातील, असे मंडळाने यावेळी नमूद केले.
मागील हंगामात बीसीसीआयला कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे वयोगटातील कोणतीही स्पर्धा खेळवता आली नाही. शिवाय, रणजी स्पर्धा देखील रद्द करावी लागली होती. यंदा मात्र पूर्ण प्रथमश्रेणी हंगाम होणार आहे. सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा दि. 20 ऑक्टोबर 2021 पासून तर विजय हजारे चषक स्पर्धा दि. 23 फेब्रुवारी 2022 पासून खेळवली जाईल, असे मंडळाने म्हटले आहे.
‘दि. 21 सप्टेंबर रोजी हंगामाची सुरुवात होईल. सर्वप्रथम वरिष्ठ महिलांची वनडे लीग खेळवली जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ महिलांची वनडे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा होईल. चॅलेंजर चषक स्पर्धा दि. 27 ऑक्टोबर 2021 पासून खेळवली जाईल’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले. सईद मुश्ताक अली स्पर्धेची फायनल दि. 12 नोव्हेंबर रोजी होईल.
यंदा रणजी स्पर्धेसाठी 3 महिन्यांचा विंडो निश्चित केला गेला असून त्यानुसार, ही स्पर्धा दि. 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार आहे. या सर्व प्रथमश्रेणी स्पर्धा भरवताना सर्व खेळाडू व संलग्न घटकांच्या स्वास्थ व सुरक्षिततेला सर्वोच्च स्थान दिले जाईल, असे मंडळाने यावेळी अभिवचन दिले आहे.