मगो नेते सुदिन ढवळीकर यांचा दावा : तृणमूलला विश्वासात घेऊनच निर्णय.काँग्रेसकडून ढवळीकरांना पाठिंब्याची गळ
प्रतिनिधी /पणजी
मतमोजणीस आता केवळ 24 तास शिल्लक राहिलेले असताना गोव्यात आगामी सरकार स्थापनेवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्या दरम्यान जोरदार राजकीय हालचाली सुरु झालेल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन भाजपचेच सरकार स्थापन करण्यासाठी आशीर्वाद मिळविला तर दुसऱया बाजूने काँग्रेस नेत्यांनी सुदिन ढवळीकर यांना आपल्याबरोबर रहाण्यासाठी गळ घातली. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते गोव्यात दाखल झालेले आहेत. तृणमूलचे अनेक नेते सायंकाळी गोव्यात पोहोचले. भाजपकडून धोका असल्याने काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना बांबोळी येथील रिसॉर्टवर ठेवले आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी एवढी वर्षे मगो ‘किंगमेकर’ होता, यावळी मगोच ‘किंग’ ठरणार असल्याचे निवेदन केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत. काँग्रेसचे पी. चिदंबरम तसेच कर्नाटकातून सतीश जारकीहोळी, दिनेश गुंडु राव हे तर तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन, अभिषेक बॅनर्जी, आयपॅकचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर हे देखील मंगळवारी गोव्यात पोहोचले.
काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरणार
गोवा विधानसभेसाठी दि. 14 फेब्रुवारी रोजी झालेले मतदान हे 82 टक्के पर्यंत पोहोचलेले आहे. याची मतमोजणी आता उद्या गुरुवार दि. 10 मार्च रोजी होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरणार आहे, काँग्रेसच्या मागोमाग भाजप हा देखील पुढे येईल. परंतु कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने गोव्यात खिचडी सरकार स्थापन करावे लागणार आहे. आघाडी कोणाशी करावी? या प्रश्नावरून सध्या काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये तपासणी चालू आहे.
विश्वजित – अमित शहांची भेट
भाजपने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत कितीही आकडा खाली आला तरी देखील सरकार भाजपचेच स्थापन करण्याचे ठरविले आहे. भाजपने जास्तीत जास्त अपक्ष उमेदवारांशी संपर्क ठेवला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे हे दोन इच्छुक नेते आहेत. गेल्या आठवडय़ात विश्वजित राणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सरकार स्थापण्यासाठी बरीचशी सूत्रे आपल्या हाती मिळविली.
मुख्यमंत्र्यांनी घेतले पंतप्रधानांचे आशीर्वाद
मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नवी दिल्लीला गेले. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गोव्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि पंतप्रधानांनी त्यांना आपला आशीर्वाद दिला.
मुख्यमंत्रीपदासाठी सुदिनचा दावा ?
प्राप्त माहितीनुसार मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी जो पक्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर देईल त्या पक्षाबरोबर जाणेच मगोला परवडणार व शक्य आहे, असा संदेश काँग्रेस पक्षाला दिलेला आहे. भाजपचे सरकार रोखण्यासाठी काँग्रेस यावेळी वाट्टेल ती भूमिका घेण्यास राजी होईल. मात्र काँग्रेसचे 15 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आल्यास काँग्रेस मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस सोडून अन्य कोणत्याही पक्षाला देणार नाही. मात्र पी. चिदंबरम यांनी सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. मगो नेते सुदिन ढवळीकर यांची भेट घेण्यास भाजप तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न दिवसभर चालूच ठेवले. बाबूश मोन्सेरात यांनी देखील सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी आजपर्यंत मगो हा सरकारमध्ये ‘किंग मेकर’ होता आता मगोच ‘किंग’ बनणार आहे, असे निवेदन त्यांनी केले.
गरज पडल्यास मगोची मदत घेणार
भाजपच्या अनेक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना राज्यात स्थिर सरकार स्थापनेसाठी पक्षाने मगोची मदत घ्यावी. अपक्ष हे कधीही साथ सोडून जाऊ शकतात. यामुळेच मगो बरोबर आघाडी करावी, असे मत होते. मात्र भाजपचे काही नेते मगो पक्षाला फोडण्याची भाषा करीत आहेत. त्यांनी डिचोलीचे मगो उमेदवार नरेश सावळ यांच्याशी संपर्क केलेला आहे. भाजप पूर्ण बहुमतावर येणार नाही हे माहित असताना मगो पक्षाला सांभाळण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गरज पडल्यास मगोची मदत घेणार असे निवेदन केल्याने मगोने भाजपपासून थोडे अंतर राखले आणि भाजपमध्ये देखील अस्वस्थता पसरली.
तृणमूल नेते गोव्यात दाखल
तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन व अभिषेक बॅनर्जी हे गोव्यात पोहोचले आहेत. आयपॅकचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर हे देखील मंगळवारी गोव्यात पोहोचले असून गोव्यात भाजप विरोधी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी सुदिन ढवळीकर यांनी बोलावलेल्या आपल्या उमेदवारांच्या बैठकीत त्यांना पुढील राजकीय निर्णयासाठी सज्ज रहा असे कळविले तर सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर हे आज तृणमूल नेत्यांबरोबर सविस्तर चर्चा करणार आहेत.
काँग्रेसने आपल्या उमेदवारांना ठेवले रिसॉर्टवर
आगामी सरकार कोणाचे, यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु झालेली आहे. भाजपने अपक्ष उमेदवारांशी सरकार स्थापनेसाठी संपर्क केलेला आहे. काँग्रेसने आपल्या नेत्यांना, आमदारांना कोणीही फोडू नये यासाठी सर्व उमेदवारांना बांबोळी येथील रिसॉर्टवर ठेवलेले आहे. निवडणूक निकाल झाल्यानंतर नेता निवडून थेट राज्यपालांकडे जाण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. त्यामुळे विजय झाल्यानंतरही उमेदवारांना जनतेमध्ये विजय साजरा करण्यास जाता येणार नाही. 2017 मध्ये भाजपने जे केले त्यावर काँग्रेसने आता हा रिसॉर्टचा उतारा शोधून काढला आहे.
काय होऊ शकते उद्या राज्यात?
सध्या भारतीय जनता पार्टी एकटी पडलेली आहे. आप, तृणमूल हे दोन्ही पक्ष काँग्रेसला गरज पडल्यास सहकार्य करतील. भाजपबरोबर काही अपक्ष जाऊ शकतात. ते देखील त्या पक्षाला बहुमत मिळत असेल तर. मगो पक्षाने आपण भाजपबरोबर जाणार नाही हे सांगितलेले आहे. भाजप विरोधात काँग्रेस+मगो+तृणमूल+आप हे सर्व एकत्र आल्यानंतर एक दोन अपक्षांची साथही काँग्रेसला प्राप्त होणार असल्याने काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तथापि, कोणाला किती जागा प्राप्त होतात, यावर हे सारे काही अवलंबून आहे.
भाजप 22 पेक्षा अधिक जागा जिंकणार : मुख्यमंत्री
पंतप्रधानांना भेटून आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, भाजप 22 पेक्षा जास्त जागा जिंकणार असून अपक्ष व इतर प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने गोवा राज्यात भाजपचे सरकार येईल. भाजपचे केंद्रीय नेतृत्व अपक्ष – इतर पक्षीय उमेदवारांच्या संपर्कात असून त्यांच्याकडे बोलणी चालू आहेत. गरज पडली तर मगो पक्षाचा पाठिंबा घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच डॉ. सावंत यांनी केले.
गोव्यातील निवडणुकीनंतर मोदींशी प्रथमच भेट होऊ सविस्तर चर्चा झाल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. गोव्यातील संभाव्य निकालाचा तपशील मोदींना दिल्याचे ते म्हणाले. भाजप स्वबळावर गोव्यात सरकार स्थापन करेल, अशी खात्री मोदींनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांचे आशीर्वाद भाजपच्या पाठीशी आहेत असे सांगून गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असून सरकार स्थापनेबाबत विचार विनिमय होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. गोव्यातील जनतेने भाजपला मतदान केले असून 2022 विधानसभा निवडणूक मध्ये भाजपला 22 प्लस जागा मिळणार असल्याचा पुनरुच्चार डॉ. सावंत यांनी केला आहे. दरम्यान, सर्व भाजपतर्फे उमेदवारांशी संपर्क साधण्यात येत असून त्यांना मतमोजणीसाठी सज्ज राहाण्याचे निर्देश देण्यात आल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.