फराळाच्या दरही 10 ते 20 टक्क्यांनी वाढले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था नियोजन विस्कळीत झाले आहे, परिणामी याचे सावट आता दिवाळी सणावरही मोठया प्रमाणावर निर्माण झाले आहे, दरवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद यंदा दिवाळी खरेदीला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱयांमधून व्यक्त होत आहे. दिवाळी म्हटले की, फराळ, नवीन कपडे यांची मोठी उलाढाल होते. नोकरी-व्यवसाय व्यस्त असणाऱया महिला वर्गांकडून मोठया प्रमाणावर रेडिमेड फराळाला मागणी असते यंदा या मागणीत घट झाली असून घरच्या घरी फराळ बनविण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच यंदा दिवाळी रेडिमेड फराळाचे दर खाद्यतेलामुळे 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे.
दिवाळी सणाची लगबग 15 ते 20 दिवस आधीपासूनच सुरू होते यंदा मात्र अद्यापही लगबग फारसे सुरू झालेले नाही. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या, पगार कमी, उद्योगधंदे वगैरे अडचणीत असल्याने दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसुन येत नाही. सर्वाधिक उलाढाल ही कपडे खरेदी आणि फराळांची होते, मात्र यंदा या दोन्ही गोष्टी खरेदीसाठी ग्राहकांचा निरूत्साह दिसून येत आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त असणाऱया विशेषत: महिला वर्गांना फराळ करण्यास वेळ मिळत नाही, अशावेळी 50 टक्के महिलांची रेडिमेड फराळाला अधिक मागणी असते मात्र यंदा कोरोनामुळे विशेषत: खाजगी क्षेत्रातील नोकरदार महिला या घरात तीन चार होत्या, संपूर्ण कुटुंब एकत्र आले त्यामुळे घरात विविध पदार्थ बनविण्याची रेलचेल वाढली आहे.
युटय़ूबवर विविध पदार्थ रेसिपी व्हिडिओ डाऊनलोड झालेले आहेत. त्यामुळे यू टय़ूबवर बघून रेसिपी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य महिलांसह सेलिब्रेटीनीदेखील विविध पदार्थ बनवण्याचा आनंद घेतला होता अद्यापही बहुतांश पदार्थ घरीच बनविले जात आहे. कोरोनाची संख्या जरी कमी झालेली असेल तरी बाहेरील पदार्थ्यांची मागणी घटली असल्याचे सध्या चित्र आहे.
सध्या सोशल मिडियावर फराळाचे रेसिपीच्या अनेक सोप्या पध्दती उपलब्ध असल्याने बचतगट व इतर महिला उद्योगिनी केंद्राकडे फराळाची मागणी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊननंतर अनेक वस्तू आणि किराणा साहित्याचे दर वाढले असून परिणामी फराळाचे दरही 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे. येथील सुरूची महिला उद्योग आणि नलिनी फूडस् मध्ये दरवर्षीपेक्षा यंदा फराळाची मागणी कमी झाली असली तरी होलसेल ची ऑर्डर मोठी आहे., याबाबत कारण विचारले असता बहुतांश गृहीणी सध्या नोकरी गेल्याने, किंवा घरात आता इतर मंडळी कार्यान्वित असल्याने फराळ आपल्या बजेटनुसार बनविण्याचा प्रयत्न करत आहेत, याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची काळजी घेवून सर्व पदार्थ बनविले असून या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न असतो अशी माहिती सुरूची महिला उद्योगकडून देण्यात आले.
रत्नागिरी शहरात मारूती मंदिर, माळनाका, जे.के. फाईल्स, सावरकर नाटय़गृह, बाजारपेठ व इतर काही ठिकाणी दिवाळी साहित्य विक्री प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत, यामध्ये अगदी फराळ, कंदील, पणत्यापासून सर्व साहित्यांचा समावेश आहे, ग्राहक खरेदीला येतात मात्र गतवर्षीपेक्षा हा प्रतिसाद कमी असल्याचे महिला बचतगटांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.
फराळाबरोबरच अधिक खरेदी केली जाते ती कपडय़ांची! मात्र बाजारात जरी वर्दळ दिसत असली तरी गतवर्षीप्रमाणे गर्दी नाही, आर्थिक टंचाईमुळे खरेदीला प्रतिसाद कमी असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे.