लुनेश विरकर/ म्हसवड
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करत संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात लग्न असणार्यांची लग्ने पुढे ढकलण्यात आली आहेत. कोरोनाची परिस्थिती केव्हा एकदा संपुष्टात येईन व आपल्या डोक्यावर केव्हाशी एकदा अक्षता पडतील याची उत्सुकता अनेक जोडप्यांना लागल्याची दिसून येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढविल्यामुळे मे महिना सुध्दा आपल्या हातून जाणार या भितीने वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहणार्याची चांगलीच निराशा झाली आहे. परिणामी लग्नाच्या मुहूर्तही लांबणीवर पडण्याची भिती असल्याने यंदा कर्तव्य करण्याचा तयारीत असणार्यांची झोप उडाली असून धाकधूक मात्र चांगलेच वाढले आहे.
दरवर्षी फेब्रुवारी ते मे महिन्यात लग्नसराईचे दिवस असतात. यंदा डिसेंबर मध्ये चीन या देशात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. विदेशातून आलेल्या नागरिकामुळे देशात फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाउन सारखे उपाययोजनाकरण्यात आल्या. मार्च महिन्यात लग्न तिथी काढलेल्या वधू व वरांचे लग्न ठरलेल्या दिवशी झाली नाहीत. गर्दीतून कोरोना पसरण्याची भीती असल्याने अनेकांनी स्वत:हून पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला. आणि ज्यांनी तशाच परिस्थितीमध्ये लग्न करायचा निर्णय घेतला अशावरती संबंधित विभागने संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवून गुन्हे दाखल करण्यात आले.
मे महिन्यात लग्न तारीख काढणे अवघड असल्याने अनेकांनी जून-जुलै महिन्यातील तारखा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोरोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात आला तरच जून-जुलै महिन्यात किमान पाहुणे-रावळ्यांत तरी लग्न होईल याची आशा वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहणारांना आहे. मात्र ही अपेक्षा पूर्ण होईल की नाही, याची मात्र कोणालाच खात्री नसल्याचे दिसून येत आहे. 3 मे नंतर जरी लॉकडाउन उठले तरी सार्वजनिक कार्यक्रमांना शासन दोन ते तीन महिने परवानगी देण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा कर्तव्य आहे यांनी दिवाळी पर्यंत थांबण्याची मानसिकता करायला हवी आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी बहुतांश नागरीक स्वत हून गर्दीची ठिकाणे टाळत आहेत. त्यामुळे लॉकडाउन उठल्यावर जरी लग्न काढले तरी लग्नासाठी किती पाहुणे उपस्थित राहतील, याचा अंदाज करणे कठीण आहे. त्यामुळे यंदा कर्तव्य आहे या जोडप्यांना सध्या तरी थोड संयम ठेवल्याशिवाय कोणताच पर्याय नाही.