कोरोना संकटाचा शैक्षणिक क्षेत्रावरही परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना संकटाचा दूरगामी परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या अध्यापन-अध्ययनापासून शिक्षक नियुक्ती प्रक्रिया ठप्प झाली आहे. शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्चितता असताना 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील शिक्षक बदलीलाही ब्रेक लागला असून यंदा शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे बदलीच्या कात्रीत अडकणाऱया शिक्षकांना दिलासा मिळाला असून बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱया शिक्षकांना मात्र पुढील निर्णयाची वाट पहावी लागणार आहे.
शिक्षक बदली प्रक्रियेंतर्गत सक्तीनुसार बदली, ऐच्छिक बदली, परस्पर बदली केली जाते. यामुळे सोयीनुसार बदलीचा लाभ घेण्यासाठी अनेकजण प्रतीक्षेत असतात. मात्र यंदा बदली प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र तांत्रिक अडचण पुढे करत बदलीला तारीख पे तारीख दिली जाते. यामुळे गतवर्षाच्या प्रारंभीला राबविलेल्या बदली प्रक्रियेला सहा महिन्यांनंतर पूर्णविराम देण्यात आला होता.
यंदा बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनाचे संकट वाढत असताना शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यामुळे बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यामुळे तुर्तास शहरामधून ग्रामीण भागात बदली होणाऱया शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. तर गतवर्षी बदलीअंतर्गत अनेक समस्यांना सामोरे गेलेल्या व अन्याय झालेल्या शिक्षकांना मात्र बदलीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.