गणेश चतुर्थी आली. ते दहा दिवस सुरू झाले. आम्ही लहान असतानाचे ते दहा दिवस केव्हाच हरवले होते. आम्ही तरुण असतानाचे रोमांचकारी दिवस देखील तारुण्याबरोबर हरवून गेले.
काही मंडळे भव्य विद्युत रोषणाई करीत. तिथे गाणी लावीत. ज्या काळात चहाचा एक कप पंचवीस ते तीस पैशांना मिळे त्या काळात दुकानात जाऊन सिनेमाचे गाणे ऐकायला दहा पैसे पडत. रेडिओवर गाणी लावली जात ती त्या संपादकांच्या मर्जीने. त्यातही अनेकांच्या घरी एकच बँडचा रेडिओ असायचा नि त्यावर फक्त विविध भारती लागायची. भरपूर गाणी सुनावणारे सिलोन स्टेशन ऐकण्यासाठी दोन बँडचा महागडा रेडिओ घ्यावा लागे. ग्रामोफोन विकत घेण्याची ऐपत अद्याप घरोघरी झिरपली नव्हती. हे सगळे असे होते आणि म्हणून गणेशोत्सवात विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी गाणी (त्या काळी मांडवासमोर रफी-किशोर-मुकेश-लता-आशा वगैरे मातब्बरांची कर्णमधुर गाणी लावायची प्रथा होती) लावली की मुले अधाशासारखी तिथे जाऊन रस्त्याच्या कडेला तास न् तास उभी राहून किंवा फूटपाथवर बसून ती गाणी ऐकत. सतत आणि सगळीकडे लावले जाणारे ज्युवेल थीफमधले एकच एक गाणे होठों पे ऐसी बात-सुपरडुपर हिट्ट होते. शांताबाई किंवा पारुची पप्पी किंवा शिट्टी वाजली किंवा आवाज वाढव डीजे, काला कौव्वा किंवा वाट माझी बघतोय रिक्षावालासारखी गाणी रचणारे थोर गीतकार, संगीतकार, गायक जन्माला आले नव्हते.
नंतरच्या काळात गणपतीसमोर होणारी व्याख्याने दुर्मिळ होत होत नाहीशी झाली. गणरायाचे आगमन होताना ढोलपथकाच्या ढोलवादनाने स्वागत होऊ लागले. पण या उत्सवाचा आनंद काही वेगळाच असतो. सुट्टी असो की नसो, दहा दिवस सुट्टीचे आणि सणाचेच वातावरण असते. मोदक करता येणाऱया गृहिणी दुर्मिळ होत गेल्या असल्या तरी व्यवसायकुशल हातांनी केलेले उकडीचे उत्तम मोदक घरपोच मिळू शकतात. सकाळच्या वेळी घराघरातून आरत्यांचे आवाज कानांवर पडले की नास्तिकांच्या जिभेवर देखील साखरफुटाणे, बत्तासे, पेढे वगैरे चवींच्या मिश्रणाचे रोमांच उठतात आणि लहानपणी चाखलेल्या चवींच्या स्मरणरंजनामुळे मन व्याकूळ होते.
या वषी कोरोनामुळे हे सर्व नाही याचे दु:ख आहेच. पण पुढाऱयांनी चिथावणी देऊनही लोकांना सण आणि सणाची गर्दी टाळण्याचा विवेक सुचला याचा आनंद अधिक आहे.