ऑनलाईन टीम / पुणे :
यंदा ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करून यंदा 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती करु, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाचा अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला इथेनॉलची गरज आहे. ऊसाचे उत्पादन वाढले मात्र, पुढील वर्षी गाळप करण्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे.
- यूपीतील घटना घृणास्पद
हाथरसमध्ये त्या युवती बरोबर बलात्कार झाला नाही, असे पोलीस आयुक्तांचे म्हणणे ऐकले. पण तिची हत्या तर झाली आहे. मग तिच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात का दिला नाही? उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन कसे वागतात? कायद्याचे राज्य, मूलभूत अधिकार यावर तुमचा कवडीचा विश्वास नाही, असे दिसते. युपीमध्ये घडलेली घटना घृणास्पद आहे, असेही पवारांनी यावेळी नमूद केले.
- आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही
सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असून, स्थगिती उठवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही, असे पवार यांनी सांगितले.
- मी प्रतिकारशक्ती वाढवण्याची लस घेतली
मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जावून आलो पण मी घेतलेली लस कोरोनाची नाही. तर मी प्रतिकारशक्ती वाढवण्याची लस टोचून आलो, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लसीबाबत विचारले असता लगावला. ते म्हणाले कोविडची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल, असे सिरमकडून सांगण्यात आले आहे, असेही पवारांनी यावेळी सांगितले.