मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
जलजीवन मिशन योजनेंतर्गत यंदा ग्रामीण भागातील 25 लाख घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा, अशी सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा अधिकाऱयांना केली. मंगळवारी बेंगळुरातील गृहकार्यालय कृष्णामध्ये झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री येडियुराप्पा पुढे म्हणाले, राज्यात 91.91 लाख कुटुंबे ग्रामीण भागात असून यापूर्वीच 28 लाखांपेक्षा अधिक घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 2021-22 मध्ये 25.17 लाख घरांना पाणी पुरवठा करण्याचे उदिष्ट ठेवले असून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱयांना दिले.
राज्यात आतापर्यंत 435 बहुग्राम योजना पूर्ण झाल्या असून 69 योजना प्रगतीपथावर आहेत. 30 योजनांना अनुमोदन देण्यात आले असून 2021-22 सालात 161 योजनांचा प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वकांक्षी योजना असून नियोजित वेळेत पूर्ण करा. यासाठी सर्व जिल्हय़ातील जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉ. ई. व्ही. रमणरेड्डी, सरकारचे अप्पर मुख्य सचिव वंदिता शर्मा, अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव आय. एस. एन. प्रसाद, ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे अप्पर मुख्य सचिव एल. के. अतिक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.