लडाख संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा पुनरूच्चार, राजनाथ सिंग यांची संरक्षण दल प्रमुखांशी चर्चा,
500 कोटीची खरेदी करण्याचे अधिकार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनबरोबरच्या लडाख संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सेना प्रमुखांशी रविवारी चर्चा केली आहे. चीनला रोखण्यासाठी सेनेला यथोचित आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची पूर्ण मुभा देण्यात आली आहे, याचा या भेटीनंतर संरक्षण मंत्रालयाकडून पुनरुच्चार करण्यात आला.
राजनाथ सिंग लवकरच रशियाच्या दौऱयावर जात असून तेथे लडाख स्थितीसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र ते भारत-रशिया-चीन अशा त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होणार नाहीत, असे सांगण्यात आले. प्राप्त परिस्थितीत चीनच्या नेत्यांशी कोणतीही राजकीय पातळीवर चर्चा केली जाणार नाही, असे भारताचे धोरण आहे, अशी माहिती काही सूत्रांनी पत्रकारांना दिली आहे.
रशियातील कार्यक्रमात सहभाग
रशियात 24 जूनला दुसऱया महायुद्धातील विजयाला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे भव्य कार्यक्रम व संचलन होत आहे. या संचलनात भारताच्या सैनिकांची एक तुकडीही समाविष्ट होणार आहे. याच कार्यक्रमासाठी रशियाने राजनाथसिंग यांना आमंत्रित केले आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात भारतीय मंत्र्यांचा हा पहिलाच विदेशी दौरा होणार आहे.
500 कोटीची खरेदी करण्याचे अधिकार
भारतीय सेनांना 500 कोटी रुपयांच्या संरक्षण साधनांची खरेदी थेट करण्याचे अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत. लडाख संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही खरेदी संरक्षण मंत्रालयाच्या अनुमती शिवाय करण्यात येऊ शकेल. याचा लाभ प्रामुख्याने भारतीय वायुदलाला होणार आहे. तसेच भूसेनाही तिच्या आवश्यकतेनुसार दारूगोळा व इतर सामग्री खरेदी करू शकणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चीनचेही सैनिक केले मुक्त
माजी सेनाप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी रविवारी महत्वाचा गौप्यस्फोट केला आहे. लडाख येथील हिंसक संघर्षात भारताने चीनच्या काही सैनिकांना पकडले होते. तथापि, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली. भारताच्या सैनिकांनी चीनच्या किमान 50 सैनिकांना ठार केले आहे. या संघर्षात किमान 600 सैनिकांनी भाग घेतला, अशीही महत्वाची माहिती त्यांनी दिली.
ट्रम्प यांचा दावा
भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवरील स्थिती अत्यंत नाजूक असून आपण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांशी संपर्कात आहोत, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष युद्धाच्या पातळीपर्यंत पोहचू नये, हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अद्याप त्यांच्या दाव्याला भारताने दुजोरा दिलेला नाही.
14 व्या पोस्टकडून चीनची माघार
गेल्या गुरूवारी चीनने भारताची लडाख भागातील चौदावी पोस्ट (चौकी) घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तो हाणून पाडण्यात आला. भारताच्या सैनिकांनी अतिशय नियोजनबद्ध कारवाई करून चीनी सैनिकांना मागे सारले. त्यामुळे चीनचा डाव उधळला गेला, असे आता स्पष्ट होत आहे.
चिनी सैनिकांच्या मोडल्या माना
चीनच्या सीमेत चौकशीसाठी गेलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचे निर्घृण कृत्य चीनी सैनिकांनी केले होते. त्यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तथापि, या सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांना ठार केले. अनेक चीनी सैनिकांच्या माना मोडल्या गेल्या, असेही आता स्पष्ट होत आहे.
सर्वपक्षीय बैठकीत काँगेस एकाकी
शुक्रवारी लडाख संघर्षासंबंधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँगेस पक्ष एकाकी पडल्याचे दिसून आले होते. या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सरकारला 7 प्रश्न विचारले होते. तसेच भारताची भूमी चीनने बळकाविली आहे, असा आरोप केला होता. तथापि, त्यांच्या या आरोपाचे समर्थन डावे वगळता अन्य कोणत्याही विरोधी पक्षाने केले नाही. याउलट नेहमी भाजपला विरोध करणाऱया पक्षांनीही पंतप्रधान मोदी व सरकारच्या बाजून ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
सर्व सीमा सुरक्षित
भारताच्या सर्व सीमा सुरक्षित असून कोणत्याही देशाला भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचे धाडस झालेले नाही. भारतीय सेना सीमांचे उत्कृष्टरित्या संरक्षण करीत असून घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. भविष्यातही असा कोणाचाही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर राजकारण
भारताची एक इंच भूमीही अन्य कोणत्या देशाने बळकाविलेली नाही. कोणालाही भारताच्या सीमेत अतिक्रमण करू दिले गेलेले नाही. भारताच्या शूर सैनिकांनी आपली सीमारेषा सुरक्षित ठेवली आहे. सीमारेषेचे संरक्षण करतानाच 20 भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. मात्र, त्यांनी विरूद्ध बाजूची मोठय़ा प्रमाणात हानी केली आहे, असे स्पष्ट आणि निःसंदिग्ध विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर केले होते. मात्र तरीही विरोधकांकडून, विशेषतः काँगेसकडून या प्रश्नाचे राजकारण केले जात आहे.
काँगेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी नसून ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशी टीका केली. यावर भाजपने ‘गद्दार’ गांधींकडून यापेक्षा वेगळय़ा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, असा प्रतिटोला लगावला आहे. राहुल गांधी भारताच्या सेनांचा अपमान करीत असून त्यांच्या क्षमतेवर शंका घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीकाही भाजपने केली आहे.