अवधुतानी यदुमहाराजांना सद्गुरुंचा उपदेश प्रत्यक्ष जीवनात अमलात आणण्यासाठी चोवीस गुरु केल्याचे सांगितले. चोवीस गुरुंकडून शिकलेल्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्या सर्व शंकाकुशंका फिटल्या आणि निःसंग होऊन ते पृथ्वीवर फिरू लागले. ही सर्व हकिकत यदुराजांना सांगितल्यावर अवधुतानी राजाला आलिंगन दिले. अवधूत साक्षात् दत्तात्रेयच होते त्यांनी यदुराजाला आलिंगन दिले आणि त्याला आत्मस्वरूपज्ञानाचा अनुभव आणून दिला.
निजबोधाच्या योगाने ते दोघे एकरूप होऊन गेले. आनंदरूपी मेघ डोळय़ांमध्ये भरून येऊन प्रेमाश्रूंचा वर्षाव करू लागले. अहंकाराची बेडी तुटली. यदूने सारा जीवभाव गुरुनाथाला अर्पण केला. दत्तात्रेयांची शिष्यपरंपरा म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदु आणि ‘जनार्दन’ हा तिसरा शिष्य दत्तमहाराजांनी कलियुगामध्ये केला.
नाथमहाराजांचे सद्गुरु जनार्दनस्वामी दत्तात्रेयांचे शिष्य कसे झाले ती हकिकत थोडक्मयात पाहू. नाथबाबा सांगतात,
आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल म्हणून जनार्दन स्वामींना अतिशय चिंता लागून राहिली होती. त्या सद्गुरुच्या चिंतनामध्ये त्याना तिन्ही अवस्थांचा विसर पडला.
परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे त्यांची खरीखुरी तळमळ जाणून श्रीदत्तमहाराज त्यांच्याकडे आले व त्यांनी स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर तत्काळ जनार्दनस्वामींना आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचे मूळच मिथ्या झाले. कर्म करून अकर्ता असणे हा अकर्तेपणाचा बोध श्रीदत्तांनी त्यांना दिला. देहात असून विदेही राहण्याच्या बोधाचेही त्यांना आकलन झाले.
गृहस्थाश्रम न सोडता, कर्ममर्यादेचे उल्लंघन न करता, व्यवहारात वागले तर आत्मबोध केव्हाही मलिन होत नाही. हा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे मनाचा मीपणा नाहीसा झाला. ती अवस्था जनार्दनाना न आवरता आल्यामुळे ते मूर्छा येऊन पडले. तेव्हा त्याना तत्काळ सावध करून दत्तात्रेय म्हणाले की, प्रेम ही सत्त्वगुणाची अवस्था आहे म्हणून ते गिळून टाकून निजबोधानेच वर्तत रहा. दत्तात्रेयांचा पूजाविधी करून त्यांच्या पायांवर जनार्दनस्वामी मस्तक ठेवतात तोच योगमायेच्या योगाने दत्तात्रेय अदृश्य झाले. आपल्या चालू असलेल्या भागवताच्या अभ्यासात थोडा व्यत्यय आला पण प्रसंगानुसार गुरुसंबंधी विचार निघाला, म्हणून नाथबाबानी त्यांच्या गुरुचीच कथा
सांगितली.
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, याप्रमाणे यदूराजाना ब्रह्मज्ञान सांगून त्याचे समाधान झालेले पाहून अवधूत त्याला विचारून जायला निघाले. तेव्हा राजाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि मोठय़ा प्रेमाने त्यांची पूजा करून त्याना प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायांवर मस्तक ठेवले. अवधूत राजाला मी जाऊ का असे विचारत होते पण त्यांना ‘जा’ असे राजाला मुळीच म्हणवेना कारण त्यांचा वियोग त्याला दुःसह वाटू लागला. ‘रहा’ म्हणावे तर मालकी दाखविल्यासारखे होते. राजाची मनःस्थिती द्विधा झाली. त्याला काय बोलावे काही सुचेना. ती त्याची अवस्था पाहून श्रीदत्तात्रेयाना करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुदेने सांगितले की, आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही. राजाधिराजाला याप्रमाणे आश्वासन देऊन श्रीदत्तात्रेय निघाले. आनंदाने ते आले होते तितक्मयाच आनंदाने ते निघून गेले. राजा अत्यंत प्रेमाने समाधान पावला आणि निजात्मबोधाने निरंतरचा सुखी झाला.
उद्धवा, यदुराजा हा आपल्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणि होता. तू म्हणशील की, मला त्याचे नावही माहीत नाही, तेव्हा तू सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते. पण बाबा, त्याच्याच नांवावरून आपण सारे वीर आपणाला ‘यादव’ असे म्हणवून घेतो.
श्रीदत्तात्रेयाच्या भाषणावर विश्वास ठेवल्यामुळेच सर्वसंग परित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली. तू अशा वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन करणार नसशील तर त्यामुळे पूर्वजांना कमीपणा येईल’!