वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात यमनापूर (ता. बेळगाव) येथील ‘राजे ग्रुप’ यमनापूरच्या कार्यकर्त्यांनी 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत गडकोट संवर्धन व गडकोट किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविली. जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तसेच महाराजांचे गडकोट किल्ले सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजेत व येथे येणाऱया शिवभक्तांनी स्वच्छ भारत आंदोलन मोहिमेचे अवलोकन करण्याचा संदेश दिला.
यमनापूर येथील राजे ग्रुपच्या शिवभक्तांनी 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांना भेटी देऊन गडकोट संवर्धन मोहीम यशस्वी करून महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. या मोहिमेमध्ये हरिश्चंद्र गड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्हय़ांच्या सीमेवर मालशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्हय़ातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हरिहर गड हा नाशिक जिल्हय़ातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 कि.मी. अंतरावर वसलेला गड आहे.
राजे ग्रुप कार्यकर्त्यांकडून गडावर स्वच्छता मोहीम
गडकोट संवर्धन मोहीम भेटीप्रसंगी राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हरिश्चंद्र गड व हरिहर गडावरील कचरा प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्या गोळा करून सर्व कचरा गडाच्या पायथ्याशी आणून टाकला. तसेच गडावर येणाऱया शिवभक्तांना गडावरील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कुणीही कचरा टाकू नये. प्रत्येक शिवभक्ताने जर याचे पालन केल्यास शिवाजी महाराजांचा जीवंत ठेवलेला हा इतिहास सूर्य, चंद्र असेपर्यंत असाच अबाधित राहील, असा संदेशही त्यांनी या भेटीप्रसंगी दिला.
गडकोट संवर्धन मोहिमेमध्ये राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेश संभाजीचे, संदीप संभाजीचे, विशाल संभाजीचे, कार्तिक पाटील, रतन पिंगट, विशाल कोनेवाडी, विनायक हंडे, लोकेश पाटील, शुभम पाटील, आदर्श सुतार, प्रेम पाटील, विठ्ठल पाटील आदी शिवभक्त कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.