वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करूनसुद्धा यमनापूर-गौंडवाड रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी भाजी विक्रेत्यांकडून बिनधास्त भाजी विक्री सुरू आहे. प्रशासनाचे व पोलीस खात्याचे या प्रकाराकडे लक्ष नसल्यामुळे या भागात लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी या ठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी होत आहे.
शासनाने कडक लॉकडाऊन मोहीम राबवून कोरोना महामारीपासून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य शासनाकडून होत आहे.
कडक लॉकडाऊनमुळे सकाळी 6 ते 10 पर्यंतच किराणा दुकाने, औषध दुकाने, भाजी खरेदी व इतर जीवनापयोगी वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने वेळ जाहीर केली आहे. परंतु यमनापूर-गौंडवाड रस्त्यावर संध्याकाळी चारनंतर रात्री उशिरापर्यंत भाजी विक्रेत्यांकडून बिनधास्त भाजी विक्री सुरू असल्यामुळे संध्याकाळीही या रस्त्यावर एकच गर्दी होत आहे. इतर ठिकाणी संध्याकाळी बसून भाजी विक्रीला निर्बंध लादले असताना या ठिकाणी मात्र भाजी विक्रेते बेधडक भाजी विक्री करत असल्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत
आहे.
गौंडवाड, यमनापूर, कंग्राळी बुद्रुक परिसरात अनेक संशयित रुग्ण
सध्या कोरोना महामारीने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही हाहाकार माजविल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्हमुळे अनेक रुग्ण मृत्युमुखीही पडत आहेत. यमनापूर-गौंडवाड रस्त्यावर भाजी विक्री सुरू आहे. या ठिकाणी गोंडवाड, यमनापूर, कंग्राळी बुद्रुक परिसरातील नागरिक भाजी खरेदीसाठी गर्दी करत असल्यामुळे कोरोनासंसर्ग वाढण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे
कोरोना महामारीमुळे एकेकांची संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. परिस्थिती फार गंभीर आहे. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा कुटुंबातील रुग्ण हाती लागण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे रक्षण स्वतः करणे गरजेचे आहे. माहामारी टाळण्यासाठी मास्क वापरणे, नेहमी सॅनिटायझरचा वापरे, बाहेरून आल्यावर साबणाने हात धुणे, गरम अन्न, पाणी घेणे आदी नियम पाळून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो, असेही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.