बेळगाव :
यरमाळ-वडगाव रस्त्यावर पदपथाला लागून एक ट्रक गेल्या पाच वर्षांपासून बेवारस पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रस्त्याकडेलाच ट्रक पडून असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. अनेक वाहनेही या रस्त्यावर कित्येक दिवसांपासून धूळ खात पडून आहेत. त्या वाहनांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच अरुंद रस्ता व त्यात बेवारस वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतवडीतून जाणाऱया या रस्त्यावर वाहनांची सतत ये-जा असते. मात्र रस्त्यावर बेवारस उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या व रहदारीला अडथळा ठरत असलेल्या बेवारस वाहनांकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. शहर परिसरात बेवारस वाहनांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व मनपाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज व्यक्त होत आहे.