ब्रेक निकामी झाल्याने जोगुळभावी मार्गावर अपघात,मृतांमध्ये शहापूरच्या महिलेचा समावेश
बाळेपुंद्री / वार्ताहर
ब्रेक निकामी झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून रेणुका देवीच्या यात्रेला गेलेल्या भाविकांना चिरडल्याने महिलेसह दोन भाविक जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी घडली. बसाप्पा वेकाप्पा हळमनी (वय 55, रा. चिंचखंडी, ता. मुधोळ) व निकीता रमेश हदगल (वय 25, शहापूर-बेळगाव) अशी मयत झालेल्या दुर्दैवी भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे मयतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक भाविकांना धडक दिली. या घटनेने भाविकांनी आरडाओरड केली. अपघात घडल्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची माहिती मिळताच सौंदत्ती पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तणावाचे वातावरण दूर करून वाहतूक सुरळीत केली.
सौंदत्ती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारवाड डेपाची राज्य परिवहनची केए 29 एफ 1187 ही बस धारवाडहून यल्लम्मा भाविकांना घेऊन सौंदत्तीच्या डोंगरावर आली होती. परत सौंदत्ती डोंगराहून सुमारे 60 ते 70 भाविकांनी घेऊन धारवाडकडे जोगुळभावीच्या रस्त्यावरून जात असताना उतरतीवर अचानक बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि यात्रेला चालत जाणाऱया भाविकांना बसने चिरडल्याने हा अपघात घडला. सौंदत्ती पोलीस व सहकाऱयांनी अपघातस्थळी धाव घेऊन चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. चालकामुळे हा अपघात घडला की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला याबाबत तपास सुरू असून सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शहापूर परिसरावर शोककळा
निकीता रमेश हदगल
यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबाच्या भल्याची प्रार्थना करणाऱया विवाहितेचा शुक्रवारी देवीच्या डोंगरावरच बळी गेला. निकीता रमेश हदगल (वय 28) यांचा दुर्दैवी मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांना चटका लावून गेला. आपले पती आणि पाच वर्षांची मुलगी यांना मागे ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेने यल्लम्मा देवीच्या भक्तवर्गासह संपूर्ण शहापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात सासू व इतर नातलग असा परिवार आहे. अंत्यविधी शनिवारी सकाळी 9 वाजता होणार आहे. सोमवारी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे.