प्रतिनिधी/ कराड
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी यशवंत विचारांचा जागर करणाऱया व्यक्तिस यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20 चा हा पुरस्कार यशवंत विचाराचे पाईक, कराड परिसराचे भाग्यविधाते स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांना जाहीर झाला असून रविवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता येथील सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक चव्हाण, श्री कालिका कुटुंब प्रमुख मुनीर बागवान (सावकार) व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली.
स्व. पी. डी. साहेब यांचे सुपुत्र तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र
बेडकिहाळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, कविश्रेष्ठ ना. धो. महानोर, प्रा. डॉ. सदानंद मोरे, नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांचे नाम फौंडेशन, शांतीलाल मुथ्या, इंद्रजित देशमुख, श्रीनिवास पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमास पतसंस्थेच्या सभासदांनी, हितचिंतकांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.