बेळगाव / प्रतिनिधी
देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून बेळगावसह कारवार, बिदर, भालकीचा परिसर कर्नाटक राज्यामध्ये जोडल्याची घोषणा केली. यामुळे सीमाभागात उद्रेक होऊन या संपूर्ण परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. यामध्ये बेळगावच्या पाच हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे नेहरूंसमोर नमले नसते तर सीमावासीयांचा बळी गेला नसता असे प्रतिपादन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.
हुतात्मा मधु बांदेकर यांना शहापूर येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर तरूण भारतचे संपादक जयवंत मंत्री, माजी नगरसेवक नेताजी जाधव, पंढरी परब, विजय भोसले, माजी महापौर महेश नाईक, शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, रमेश पावले यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मागील 63 वर्षांपासून येथील नागरिकांवर अन्याय होत आहे. हुतात्मा दिन करण्यावर मर्यादा, साहित्य संमेलने भरवू नये याकरिता दबाव, बैठका घेऊनये याकरिता पोलीसांची आडकाठी या ना त्या कारणाने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु सीमाप्रश्नासाठी हुतात्मा झालेल्या सर्वांचे बलीदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. सीमाप्रश्न सोडवूनच आम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणवून घेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तोवर सीमाभाग केंद्रशाषित करा…
सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली परंतु अद्यापही चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे जोवर संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात जात नाही तोवर केंद्रशाषित केला तर काही प्रमाणात अन्याय कमी होणार आहे. यापूर्वीही महाराष्ट्र सरकारने दोन वेळा ही मागणी केली होती असे ठाकुर यांनी सांगितले.यावेळी विजय बांदेकर, हेमंत जांगळे, राजू शहापूरकर, भरमा जांगळे, राजू गावडोजी, प्रवीण शहापूरकर, विनायक वसुलकर, भुषण जांगळे, विष्णू जांगळे, रमेश बांदेकर, विजय जांगळे, संदीप पाटील, यल्लाप्पा जांगळे यासह उपस्थित होते.