टी-20 फलंदाज प्रशिक्षकाबाबत गंभीरचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी फलंदाज प्रशिक्षक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असण्याची काहीही गरज नाही, असे मत माजी फलंदाज व खासदार गौतम गंभीरने केले आहे. या प्रकारात प्रशिक्षकाने खेळाडूंमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची गरज असते, असे तो म्हणतो.
‘फक्त टी-20 क्रिकेटसाठीच स्वतंत्र फलंदाज प्रशिक्षक असावा, असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसलेले किंवा पुरेसे क्रिकेट न खेळलेले यशस्वी प्रशिक्षक होऊ शकत नाहीत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे तो एका क्रीडा वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाला. ‘टी-20 प्रकारात प्रशिक्षकाने खेळाडूंच्या मनात सकारात्मक वृत्ती वाढविण्याची आणि अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करण्याची गरज असते. या प्रकारात खेळाडूंना फटके कसे मारावेत हे शिकविण्याची गरज नसते. कारण लॅप शॉट किंवा रिव्हर्स लॅप शॉट असले फटके मारण्याची शिकवण कोणताच प्रशिक्षक देत नाही. तसे केल्यास खेळाडूचे नुकसानच होऊ शकते,’ असेही तो म्हणाला. यशस्वी खेळाडू निवड सदस्य होण्यास जास्त योग्य असतो, असे मतही त्याने व्यक्त केले.