पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र ः ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक विद्यार्थी-पालकांचा सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी दडपणमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जायला हवे. परीक्षेचे टेन्शन नको. परीक्षेला उत्सव बनवून त्यात रंग भरलात तर त्याचे सकारात्मक परिणाम निकालात आणि भावी आयुष्यात दिसून येतील, असा मौलिक कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा हा जीवनाचा जन्मजात भाग आहे. त्याला घाबरू नका. तुम्ही आधीच परीक्षा दिली आहे. तुमच्या अनुभवांना तुमची ताकद बनवा. तुम्ही जे करत आहात त्यावर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करत रहा, असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’ दरम्यान इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला. जवळपास अडीच तास चाललेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे 1 हजार विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तसेच या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱयातील जवळपास 15 लाखांहून अधिक विद्यार्थी-पालक व्हर्च्युअल माध्यमातून जोडले गेले. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. त्यात परीक्षेमुळे येणारा ताण कसा कमी करायचा, प्रेरणेसाठी काय करायचे, पालकांना आपली ध्येये कशी समजावून सांगायची, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होता.
तालकटोरा स्टेडियमवर येताना पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा देशभरातील विद्यार्थ्यांनी बनवलेले अनेक प्रदर्शन प्रकल्प पाहिले. यावेळी त्यांनी मुलांचे ऑटोग्राफही घेतले. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे मला खूप आवडते. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. परंतु कोरोनाच्या काळात तुमच्यासारख्या बालचमूंना भेटता आले नाही. आता खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटून आनंदित झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट
ारीक्षा जीवनातील अत्यंत साधी गोष्ट आहे, हे मनाला वारंवार सांगा. आपल्या पुढील आयुष्यातील हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱया परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येते, असे मोदी म्हणाले.
‘इनरलाईन’ने वाढवा प्रगतीचा वेग
तुम्ही ऑनलाईन अभ्यास करताना अभ्यास करता की, रील पाहता? असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला. पण त्याचदरम्यान हे ऑनलाईन-ऑफलाईनबद्दल नाही, तर एकाग्रतेबद्दल आहे. दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाईन/ऑफलाईन ऐवजी ‘इनरलाईन’ असाल, तेव्हाच तुमच्या प्रगतीचा वेगही वाढेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच ध्यानाचे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधानांनी हे मोठे शास्त्र नाही आणि त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. ध्यान करणे खूप सोपे आहे, फक्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. मन स्थिर ठेवा, आपोआप एकाग्रता वाढेल, असेही पुढे ते म्हणाले.
नव्या शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांचे हित
2014 पासून आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कामात व्यग्र होतो. या कामासाठी भारताच्या कानाकोपऱयात या विषयावर विचारमंथन झाले. देशातील चांगले अभ्यासक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडित लोकांच्या नेतृत्वावर चर्चा झाली. त्यावरून तयार केलेल्या मसुदा नंतर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यावर 15-20 लाख इनपुट्स आले. एवढय़ा मोठय़ा प्रयत्नानंतर नवे शैक्षणिक धोरण आल्याचे सांगत यातून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला भारतातील प्रत्येक विभागात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हे कार्य करणारे सर्व लोक अभिनंदनास पात्र आहेत. यामध्ये लाखो लोकांचा सहभाग आहे. ते देशातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांनी घडवले असून देशाच्या भविष्यासाठी घडवल्याचेही त्यांनी नमूद केले.