‘मला वाटतं मला आतूनच काहीतरी होतंय.. थोडी अस्वस्थता, भीती. घरात सारख्या सूचना..असं वागू नको तसं वागू नको..आता वयात आलास..मोठ्ठा झालास..घरी..बाहेर सगळीकडे तसंच..’
‘म्हणजे?’
‘मॅडम, लहान असताना कसं सगळे मायेने विचारतात, बोलतात. जवळ घेतात. पण जरा काय मिशी आली, लोक थोडं वेगळय़ाच पद्धतीने पाहतात मॅडम. कधी कधी वाटतं कुणी समजूनच घेत नाही आपल्याला. सगळय़ांचे आपल्याकडेच लक्ष आहे असेही वाटते. मग अस्वस्थता येते. कसलीतरी भीती वाटते. चिडचिड होते.
कधी वाटतं हे जीवनच नको..’ असं म्हणत कुणाल हुंदके देऊन रडू लागला. त्याने टीन एजमधे केलेला प्रवेश, शरीर मनात होणारे बदल, मोकळेपणाने समजून घेऊन बोलण्याऐवजी केवळ सारख्या सूचना देण्याची पालकांची मानसिकता यामुळे तो अस्वस्थ होता.
त्या दिवशी मनालीही समोर आली ती अस्वस्थ मनःस्थितीत. कॉलेजला गेली आणि अकरावीला अभ्यासातले लक्ष उडाले. मार्क कमी मिळू लागले. ती अगदी शांत राहू लागली. वडिलांना म्हणाली. बाबा हे टीव्ही मोबाईल काही काही नको आणि रडायला लागली. घरच्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु मनाली ‘काही नाही’ एवढेच म्हणत हुंदके देत होती. त्या दिवशी बेडरुम आवरताना आईला मनालीची डायरी सापडली. त्यामधे तिचा बालपणीचा अगदी चार वर्षांची असतानाचा एक फोटो एका पानाला चिकटवलेला होता आणि लिहिले होते ‘मी किती छान आणि निरागस होते ना? अगदी भोळीभाबडी. तेरा वर्षांनी माझ्यात एवढा बदल झाला का? मी आता निष्पाप राहिले नाही. किती गलिच्छ विचार मनात थैमान घालत आहेत. मला विचारांना आवरायचे आहे. काय होते आहे कळत नाही. मला पवित्र व्हायचंय. मला कोण मदत करणार? कुणाशी कसं बोलू मी. माझे विचार कुणाला कळले तर..शीः त्यापेक्षा हे जगणेच नको.’
आईने हे वाचले आणि ती चपापलीच…मनालीला घेऊन ती भेटायला आली होती. मनाली लहानपणापासून शांत होती. आपली वागणूक नेहमी योग्य असावी असा तिचा कटाक्ष असे. शाळेत, नातेवाईकांमध्ये. हुशार, शांत आणि आदर्श मुलगी म्हणून तिचा उल्लेख होई. वयात आल्यानंतर सुरुवातीला आईने तिला तू मोठी झालीस. आता मुलांशी जपून बोल वगैरे सांगितले. घरामध्ये आता कसे सावध आणि सतर्क रहायला हवे याचे उपदेश सतत तिच्या कानावर पडत असत. मुळातच अगदी सरळ असणाऱया मनालीच्या मनावर हे इतके कोरले गेले की पौंगडावस्थेमध्ये नैसर्गिकरीत्या होणारे बदल, निर्माण होणारे आकर्षण, निर्माण होणाऱया लैंगिक प्रेरणा, त्यासंबंधी मनात येणारे विचार याविषयी तिला घृणा वाटू लागली. मित्रमैत्रिणींचे एकमेकांबरोबर बसणे, हसणे-खिदळणे तिला पटेना. इतकेच नव्हे तर आईबाबांना एकत्र बसलेले पाहिले की तिला अस्वस्थता येऊ लागली.
पौंगडावस्था, त्यामध्ये अगदी नैसर्गिकरित्या शरीर-मनामध्ये होणारे बदल, स्त्राrपुरुषांमधील आकर्षण याविषयी तिच्याजवळ चर्चा करावी लागली. हे आकर्षण किती नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे, जगाच्या उत्पत्तीसाठी काही क्रिया नैसर्गिक आणि आवश्यक आहेत हे तिला समजावून सांगत या आकर्षणामुळे आपण भुलून जाऊन काही अविचारी कृती करू नये यासाठी काही सामाजिक संकेत आखले गेले आहेत हेही अगदी कौशल्याने समजावून सांगावे लागले. निर्माण होणाऱया या भावना नैसर्गिक आहेत. त्या भावना आणि विचार आपल्या मर्यादेत ठेवत नीट राहणे हे योग्य आहे परंतु हे सारे पाप आहे हा ठसा मनालीच्या मनावरून पुसण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार होते. विचार आणि प्रत्यक्ष कृती यातील फरक लक्षात आणून देण्यासाठी तिला सजगतेच्या काही तंत्राचा अवलंब करायला सांगत सराव करून घेणे आवश्यक होते. काही काळ मनाली माझ्याकडे समुपदेशनासाठी येत राहिली आणि नंतर यातून बाहेरही पडली.
मनालीची प्रतिक्रिया टोकाची असली तरी कमी अधिक प्रमाणात वयाच्या या टप्प्यावर असणाऱया अनेक मुलामुलींच्या अशा समस्या असतात.
टीन एज हा काळ तसा नाजूक आणि आवेगाचा काळ असतो. बालपण मागे सरते आणि या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल झपाटय़ाने घडतात.
सुरुवातीच्या उदाहरणातील कुणाल म्हणाला तसे बाहेरील जगसुद्धा लहान मुलांची जेवढी काळजी घेईल तेवढी या वयात घेतली जात नाही. पहा हं..सात आठ वर्षाच्या मुलाला आपण बसमध्ये चढायला मदत करू परंतु मिशी आलेल्या मुलाला ‘चल की पुढे.. काय वाटेत थांबलायस’ असे म्हणत वेळप्रसंगी धक्का मारूनही पुढे जाऊ.. हे होते.. होत असते.
याच वयात शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी, शिक्षण आणि करिअर निवडीचा ताण, अनेकदा निर्माण होणारी प्रेमप्रकरणे, मूड्सच्या लाटा, ‘स्व’चा शोध असे बरेच काही घडत असते. त्यामुळे मुले भांबावतातच परंतु पालकही अनेकदा गोंधळून जातात. काल परवापर्यंत वेगळा असणारा माझा मुलगा/मुलगी अशी कशी बदलली. नेमके काय असावे म्हणून गोंधळतात. मुलांच्या मनात चाललेल्या खळबळीची पुरेशी कल्पना पालकांना येत नाही किंवा आली तरी शरीरात होणारे बदल, निर्माण होणारे आकर्षण यावर कसा संवाद साधावा हे कळत नाही, तर काही वेळा ‘आम्हाला कुणी सांगितलं होतं.. हवं कशाला नको त्या विषयावर बोलायला..हल्लीची फॅडच आहेत ही..’ हा सूर आजही कानी येतो.
टीन एजर मिहिरने एका वर्कशॉपमधे मला सांगितले होते..‘मॅडम माझे पालक सतत माझ्यावर वॉच ठेवूनच असतात. मी टीन एजर झालो आणि ते ‘सीआयडी’च्या भूमिकेतच शिरले आहेत.ह्याच्याबरोबर जाऊ नको. तो असाच आहे..तो तसाच आहे. आता कुणाशी बोलत होतास, का बोलत होतास? काय पाहतोयस.. सतत संशयी नजर..यांचे काय करावे हेच कळत नाही मला.. मला तर सतत अशी जाणीव होते की मी स्पॉटलाईटखाली आहे आणि सतत मला कुणीतरी न्याहाळत आहे.’ बोलतानाही मिहिरची अस्वस्थता, राग, ती खदखद जाणवत होती. पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवे की मुलांच्या बाबतीत अगदी बेफिकीर असणे जितके धोकादायक तितकेच सतत मुलांच्या अवतीभोवती त्यांना न्याहाळत राहणे, सूचनांचा भडिमार करणेही त्रासदायकच. सुजाण आणि स्मार्ट पालकत्व हे आव्हान आहे. पाल्य आणि पालक यामधील आपलेपणाच्या धाग्याची वीण सजगतेने घट्ट ठेवणे आवश्यक आहे. आज अनेक समस्या सातत्याने आपल्या समोर येतात. पालक म्हणून मुलांची काळजी वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु धास्तावून सतत समीक्षकाच्या भूमिकेत राहणे पालकांनीही टाळायला हवे. जसे कळी उमलताना अजिबात पाणी न देणे हे धोकादायक तसेच ती नीट उमलेल ना, फुलेल ना या भीतीमधून साशंकतेने प्रमाणाबाहेर पाणी घालणेही धोकादायक आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी. अर्थात एकाच लेखामध्ये हा विषय मांडणे शक्मय नाही, त्यामुळे याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात.
-ऍड. सुमेधा संजीव देसाई